वैशिष्ट्यपूर्ण कामांच्या निधीचा बट्ट्याबोळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:13 IST2021-02-10T04:13:37+5:302021-02-10T04:13:37+5:30
वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी नगरपालिकेतील सत्ताधीशांनी वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी आलेल्या निधीचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप माजी नगरसेवक विनित डोंगरदिवे यांनी ...

वैशिष्ट्यपूर्ण कामांच्या निधीचा बट्ट्याबोळ !
वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी नगरपालिकेतील सत्ताधीशांनी वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी आलेल्या निधीचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप माजी नगरसेवक विनित डोंगरदिवे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पालिकेकडे तक्रार नोंदविली आहे.
राज्यातील नगरपालिकांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध स्वरूपाची वैशिष्ट्यपूर्ण कामे करता यावीत, याकरिता शासनाकडून निधी देण्यात येतो. या योजनेतून व्यापारी संकुल, आठवडी बाजार, नाट्यगृह, बहुउपयोगी सभागृहे, प्रशासकीय इमारती बांधणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यमान सत्ताधीशांनी वैशिष्ट्यपूर्ण निधीचा बट्ट्याबोळ केल्याचे डोंगरदिवे यांचे म्हणणे आहे. वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून अपेक्षित कामे न करता पुलाच्या निर्मितीसाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपये खर्ची घालण्यात आले. इतका मोठा पूल उभारण्यापेक्षा सद्यस्थितीत देवनाथ मठ या ठिकाणी असणारा पूल आणि महात्मा फुले भाजी मार्केट आणि शनिवार पेठ यांना जोडणारा पूल या दोन पुलांचा दर्जा उंचावला असता, तर अधिक अधिक संयुक्तिक राहिले असते, असे डोंगरदिवे यांनी म्हटले आहे.
कोट
शासणनिर्णयानुसार कामे करण्यात आली. त्या कामांना सभागृहाची मान्यतादेखील आहे.
कुणाला आक्षेप असेल, तर तक्रारीचा मार्ग खुला आहे.
सुमेध अलोने, मुख्याधिकारी
कोट २
शासननिर्णयात जी कामे अंतर्भूत आहेत, तीच कामे करण्यात आली. तक्रारकर्ते पालिकेचे सदस्य राहिलेले आहेत. त्यांना कामाची कल्पना आहे.
कमलकांत लाडोळे, नगराध्यक्ष, अंजनगाव सुर्जी