नववीच्या विद्यार्थ्यांना ‘वेलकम’ येईना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:01:24+5:30
शाळेतील विद्यार्थ्यांच्या वास्तव स्थितीतून शिक्षणाचा बट्याबोळ अधोरेखित झाला. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता अचानक शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रगती अहवाल डोळ्यांखालून घातला आणि तेही थक्क झाले. पाचवी व नववीच्या विद्यार्थ्यांना ‘वेलकम’ आणि ‘गुड मॉर्निंग’ इंग्रजीत लिहिता आले नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

नववीच्या विद्यार्थ्यांना ‘वेलकम’ येईना!
नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाटातील शाळा शिक्षकांसाठी केवळ खानावळी व टाइमपास ठरल्या असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. जिल्हा परिषदेच्या काटकुंभ येथील केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या वास्तव स्थितीतून शिक्षणाचा बट्याबोळ अधोरेखित झाला. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता अचानक शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रगती अहवाल डोळ्यांखालून घातला आणि तेही थक्क झाले. पाचवी व नववीच्या विद्यार्थ्यांना ‘वेलकम’ आणि ‘गुड मॉर्निंग’ इंग्रजीत लिहिता आले नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
तालुक्यातील काटकुंभ येथे जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत केंद्रशाळा आहे. सात शिक्षक येथे कार्यरत आहेत. येथील जागरूक पालक आपल्या पाल्यांना योग्य शिक्षण मिळावे, यासाठी वरिष्ठांकडे शिक्षकांची मागणी करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती अहवाल स्वत: पाहणे, याकडे लक्ष देतात. तरीसुद्धा विद्यार्थ्यांना काहीच येत नसल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विनोद राठोड, नवीन राठोड, राजेश मालवीय, कमलेश राठोड महेश मालवीय व अन्य काही पालकांनी अचानक शाळेला भेट दिली. एवढेच नव्हे तर वर्गखोलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दुसरीकडे सुटीचा अर्ज ठेवून कुठल्याच प्रकारे तो मंजूर न करून घेता पटोरकर नामक शिक्षक गैरहजर आढळून आले. विनापरवानगी शिक्षक बेपत्ता राहत असल्याने पाल्यांना शिकविले जात नसल्याची तक्रार शुक्रवारी उपस्थित पालकांनी एका पंचनाम्यात करून ती जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाला पाठविली आहे.
शिक्षकांकडून पाठशिवणी
मुख्याध्यापिका सुनंदा खेरडे यांच्यासह काही शिक्षक शाळेत हजर होते. सातपैकी तीनच शिक्षक आठवड्यातील काही दिवस विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यानंतर पुन्हा तीन शिक्षक येऊन शिकवितात. हा पाठशिवणीचा खेळ विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय करणारा ठरला आहे.
इंग्रजीसोबत मराठीही कच्ची
पालकांनी शाळेत अचानक भेट दिल्यावर इयत्ता सहाव्या वर्गात एक शिक्षक शिकवत होते, तर उर्वरित शिक्षक कार्यालयात बसून चहाचा आस्वाद घेताना आढळून आले. पालकांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना इंग्रजीत वेलकम, गुड मॉर्निंग आणि मराठीत क्षत्रिय, गौरक्षण आदी शब्द सांगितले. विद्यार्थ्यांना लिहिता-वाचता आले नाही.