चिमुकल्यांचा सुट्टी मूड कायम; अभ्यासाचा पडला विसर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST2021-07-10T04:10:31+5:302021-07-10T04:10:31+5:30
पालक चिंतातूर ऑनलाईन अभ्यासक्रम निरुपयोगी अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहे. आता जेमतेम कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा ...

चिमुकल्यांचा सुट्टी मूड कायम; अभ्यासाचा पडला विसर!
पालक चिंतातूर ऑनलाईन अभ्यासक्रम निरुपयोगी
अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहे. आता जेमतेम कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र. पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी यंदाही घरीच राहतील, असे दाट चित्र आहे. शाळा बंद असल्याने पालक वैतागले असून, मुलांचे लाड, आवडनिवडी पूर्ण करताना पालकांची कसरत होत आहे.
तिसऱ्या लाटेची भीती कायम असल्याने शाळा सुरू कराव्यात, अथवा नाही? याबाबत शासन स्पष्ट निर्णय घेत नाही. मात्र, शाळा सुरू व्हाव्यात, यासाठी पालक लक्ष ठेवून आहेत. पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू होणार असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र, पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी यंदाही शाळांविना घरीच राहतील, हे वास्तव आहे. पहिल्याच्या विद्यार्थ्यांनी शाळा बघितलीच नाही. ना शाळा, ना परीक्षा तरीही दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश या विद्यार्थ्यांना मिळाला आहे. ९० टक्के विद्यार्थ्यांना अक्षरओळख झाली नाही. शाळेचे प्रवेशद्धार बघितले नाही. केवळ ऑनलाईन शिक्षण घेत असले तरी प्रत्यक्षात अक्षर ओळख होऊ शकली नाही.
--------------------
मुलांना अक्षर ओळख होईना
- पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी मोबाईल अथवा टॅबवर ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र, ऑनलाईन शिक्षण काही खरे नाही, अशी कबुली पालकच देत आहे.
-ऑनलाईन शिक्षणाच्यावेळी मुलांसोबत पालकांना पूर्णवेळ गुंतून राहावे लागते. काही मुले मोबाईल हाताळणीत तरबेज झाले असून, पालकांचे लक्ष हटताच गेम खेळतात. अभ्यासाकडे लक्ष देत नाही.
- ऑनलाईन अभ्यासाने मुले सुन्न होत आहेत. थोडावेळ अभ्यास आणि पूर्णवेळ मोबाईलवर कार्टून खेळण्यात व्यस्त असतात. त्यामुळे अक्षर ओळख होत नाही.
-----------------------
पालकांनी घरातच घ्यावी शाळा
- मुले ऑनलाईन अभ्यास करीत नाही. त्यामुळे पालकांनी गृहपाठ घ्यावा. पाल्यांना अक्षराची ओळख कशी याचे नियोजन करावे. विशेषत: आईंनी मुलांच्या शिक्षणाची काळजी घ्यावी.
- मुले मोबाईल कमी हाताळतील, असे नियोजन करावे. टीव्हीसमोर बसून जेवण करणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल.
- किमान दिवसातून तास, दोन तास सलग अभ्यासात मुलांना गुंतून ठेवण्यासाठी विविध शक्कल लढवावी. पाटीवर लेखन करण्यासाठी त्यांचे लक्ष वेधावे, असे शिक्षण तज्ञ्ज सुरेश मोलके यांनी सांगितले.
-------------
अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक
- शाळा बंद असल्याने मुले मोबाईल, टीव्हीच्या आहारी गेले आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा येत असल्याने झोप येत असल्याची कारणे देत वेळ मारून नेतात.
- ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू असताना पालक नजर ठेवून असल्यास पोट दुखते, डोके चक्रावते, अशी कारणे देत मुले टाईमपास करतात.
- मोबाईल अथवा टॅबवर गेम्स, कार्टून बघू दिले तर बरे, अन्यथा कनेक्टिव्हिटी नाही, मॅडमचा आवाज ऐकू येत नाही, अशी कारणे देतात.
- पहिल्या वर्गातील मुले अभ्यासात मुळीच लक्ष देत नाही. खेळणे आणि टीव्ही बघणे एवढ्यावर ही मुले स्थिरावली आहेत.
----------------
पालकांची वेगळीच अडचण
‘‘ यंदा तरी जूनपासून शाळा सुरू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने शाळा तूर्त सुरू होणार नाही. परिणामी मुुले शाळांपासून दूर असल्याने शिक्षणापासून ते कायमचे दूर तर होतील नाही, अशी शंका आहे.
- अनिल पाटील, पालक
-----------
‘‘ मागील दीड वर्षापासून मुले घरी असल्याने आम्ही वैतागले आहेे. एकदाची शाळा सुरू झाली की, नियमित वेळेनुसार शाळा, अभ्यास आणि गृहपाठ याचे नियोजन करता येईल. चौथीपर्यंतचे विद्यार्थी घरीच राहणार असल्याने पालक अधिक त्रस्त होतील.
- शुभांगी देशमुख, पालक.
----------------
वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली: ४०६३५
दुसरी: ४३७४५
तिसरी: ४४१०१
चौथी : ४३८४७