सुसंस्कृतपणाची पुरुषकेंद्री व्याख्या बदलावी
By Admin | Updated: August 4, 2015 00:07 IST2015-08-04T00:07:58+5:302015-08-04T00:07:58+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्रातर्फे स्त्रियांच्या प्रश्नांवर शनिवारी गटचर्चा संपन्न झाली.

सुसंस्कृतपणाची पुरुषकेंद्री व्याख्या बदलावी
विविध विषयांवर गटचर्चा : विद्यापीठात स्त्रियांच्या प्रश्नांवर ऊहापोह
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्रातर्फे स्त्रियांच्या प्रश्नांवर शनिवारी गटचर्चा संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष म्हणून स्त्री अभ्यास केंद्राच्या समन्वयक वैशाली गुडधे (चौखंडे), प्रमुख अतिथी म्हणून मीनाक्षी वानखेडे यासह केंद्रातील भगवान पांडुरंग फाळके उपस्थित होते.
भारतीय समाजातील स्त्रियांचे अदृश्य अस्तित्व अधोरेखित होऊन त्यांचे अलक्षित प्रश्न ठळक रुपात पुढे यावे, यादृष्टीने स्त्री अभ्यास केंद्रांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतून हा एक कार्यक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. पाच विषयांवर आधारित या गटचर्चेत अनुक्रमे सुसंस्कृत स्त्री : समज-गैरसमज, पुरुषपणाची लक्षणे, जोडीदाराविषयीची संकल्पना, बेरोजगारिता आणि स्त्रिया, संपत्तीवरील स्त्रियांचा अधिकार हे विषय चर्चेला घेण्यात आले.
साधारणत: स्त्रीच्या सुसंस्कृतपणाविषयी समाजात विविध प्रकारच्या धारणा आहेत. या धारणांनी बदलत्या काळात स्त्रियांसह एकूण समाजासमोर अनेकविध प्रश्न निर्माण केले आहेत. वर्तमान काळात स्त्रीसाठी सुसंस्कृतपणाची असणारी पुरुषकेंद्री व्याख्या बदलावी लागेल, असा सूर चर्चेमधून व्यक्त करण्यात आला. ‘पुरुषपणाची लक्षणे’ या विषयावरील चर्चेत समाजामध्ये व्यक्तीची होणारी घडण हीच मुळात विषमतेच्या तत्त्वावर होत असते. त्यानुसार पुरुष आणि स्त्रीत्वाची चौकट व्यक्तीला प्रदान करण्यात येते. ही व्यवस्था पुरुषांना विशेषाधिकार देऊन स्त्रीला दास्यत्व देते. म्हणून या चौकटीला छेद देऊन नव्या जगात प्रवेश करीत असताना लिंगसमभाव आपल्या जीवनात उतरावावा लागेल, असे विचार समोर आले आहे.
‘जोडीदाराविषयीची संकल्पना’ या विषयावर चर्चा करीत असताना, जात, धर्म आणि वर्ग आणि घरंदाजपणाची चौकट यामुळे स्त्रियांबाबत जोडीदार निवडताना अनेक अनेच्छिक प्रकार घडतात. आॅनर किलिंग, घटस्फोट, हुंडाबळी यासह इतर प्रकारची स्त्रियांबाबत घडणारी हिंसा याकरिता जोडीदाराविषयीच्या संकल्पनेतील अस्पष्टताच मुख्य कारण असल्याचे दिसून येते.म्हणून जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य व्यक्तीला अत्यावश्यक असल्याचे मत चर्चेअंती व्यक्त करण्यात आले.
‘बेरोजगारिता आणि स्त्रिया’ या विषयावर चर्चा करणाऱ्या गटाने बेरोजगार म्हणून स्त्रीचा उल्लेख बौद्धिक क्षेत्रापासून तर सर्वसामान्य जीवनापर्यंत कुठेच होत नाही. कारण पुरुषकेंद्री समाजात रोजगार हा पुरूषांच्या मक्तेदारीचा भाग समजला जातो, ही महत्त्वपूर्ण नोंद करण्यात आली आहे. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि संशोधक उपस्थित होते. संचालन मनीषा इंगळकर यांनी तर प्रास्ताविक भगवान फाळके आणि आभार प्रदर्शन वैभव अर्मळ यांनी केले. (प्रतिनिधी)