लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या तीन महिन्यांपासून अक्षरश: दागिने गहाण ठेवून संसाराचा गाडा कसाबसा हाकतोय. पगार नाही. हाताला काम नाही. ज्या एसटीला आमच्या कारभाऱ्याने घाम गाळून जोपासले, त्याच एसटीच्या संपामुळे आपचे हाल होताहेत. विलिनीकरणाची आमची मागणी लगेच मान्य करून आम्हाला न्याय द्या, असा आक्रोश करीत बुधवारी संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांच्या पत्नी, मुलांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यासमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. खा. नवनीत राणा यांच्यासमवेत त्यांनी जिल्हाधिकारी नवनीत कौर यांना निवेदन दिले.सकाळी १० पासून जिजाऊ चौकात मोठ्या संख्येने महिला, लहान मुलांची गर्दी जमायला सुरुवात झाली. मागण्यांचे फलक घेऊन चिमुकली मुले या निदर्शनात सहभागी झाली होती. आजतागायत ७० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे. मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न उभा ठाकला असून कोणतेही सहकार्य मिळत नाही. त्यामुळे आता शासनानेच पुढाकार घेत आम्हाला न्याय द्यावा, अशी आर्त हाक या महिलांनी दिली. आणखी किती मृत्यू बघणार, असा सवालही शासनाला यावेळी विचारण्यात आला.
शरद पवारांनीच मध्यस्थी करावी - खा. नवनीत राणा
एसटी कर्मचाऱ्यांचे हाल, कुचंबणा होत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचे त्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे आता खासदार शरद पवार यांनीच मध्यस्थी करून तोडगा काढावा. शिवसेनेवर कुणाचाही विश्वास नाही. हे सरकार एसटी कुटुंबीयांचा जिवावर उठले आहे. तीन महिन्यांपासून पगार नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. आता तरी सरकारला जाग यावी, असे मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केले. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा शब्दही त्यांनी उपस्थित महिलांना दिला. आमदार रवि राणा यावेळी उपस्थित होते.