फुटलेला बंधारा शेतकऱ्यांना घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:11+5:30
जलसंपदा विभागातर्फे ४९ लाख ३१ हजार रुपये खर्च करून पेढी नदीचे खोलीकरण करून काटसूर येथे एका ठिकाणी पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला होता. सन २०१७-१८ मध्ये तालुक्यात पाऊस कमी झाल्याने या बंधाऱ्यात पाणी अडले नाही. मात्र गतवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान मोर्शी तालुक्यात जोरदार अतिवृष्टीमुळे पेढीनदीवरील बांधलेला तो बंधारा फुटला.

फुटलेला बंधारा शेतकऱ्यांना घातक
लोकमत न्यूज नेटवर्क
लेहगाव : मोर्शी तालुक्यातील काटसूर येथील पेढी नदीवर बांधलेला बंधारा फुटल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या बंधाऱ्याचे तातडीने बांधकाम करावे, असे निवेदन येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
जलसंपदा विभागातर्फे ४९ लाख ३१ हजार रुपये खर्च करून पेढी नदीचे खोलीकरण करून काटसूर येथे एका ठिकाणी पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला होता. सन २०१७-१८ मध्ये तालुक्यात पाऊस कमी झाल्याने या बंधाऱ्यात पाणी अडले नाही. मात्र गतवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान मोर्शी तालुक्यात जोरदार अतिवृष्टीमुळे पेढीनदीवरील बांधलेला तो बंधारा फुटला. बंधाऱ्यातील पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याअनुषंगाने काटसूर येथील शेतकरी बापुराव कुकडे, ज्ञानेश्वर केचे, अवधूत गायकवाड, गजानन वानखडे, श्रीराज कुकडे, गोपाल गायकवाड या शेतकऱ्यांनी शेतालगत असलेला बंधारा फुटल्याची तक्रार ६ जून २०१९ रोजी मोर्शीच्या तहसीलदारांकडे केली होती. त्या निवेदनाला एक वर्षे पूर्ण होऊन गेले असताना अद्यापही तक्रारीकडे कानाडोळा केला जात आहे. यंदा होणारे नुकसान टाळण्यासाठी पुन्हा एकदा तहसील कार्यालयाचे दार ठोठावण्यात आले.
पेरणी कशी करायची?
पावसाळा सुरू झाल्याने खरीप हंगामातील पेरणी कशी करावी, असा संतप्त सवाल पेढी नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांचा आहे.