-अन् वधू निघाली अल्पवयीन, लग्न पुढे ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:01:17+5:30
तळेगाव मोहना येथील श्री संत गुणवंतबाबा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी, उपविभागीय अधिकाऱ्यांना २४ जूनला पाठविलेल्या पत्रात त्या वधूची जन्मतारीख ७ मे २००३ दाखविली आहे. दाखल्यावरून वधूचे वय केवळ १७ वर्षे ठरत असल्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेत चालवलेली लग्नाची तयारी आता थांबविली आहे. दुसरीकडे वधूचे वय केवळ १७ वर्षे असल्यामुळे क्वारंटाईन सेंटरला अडकलेल्या नवरदेवाला व त्याच्या नातेवाइकांना लग्न थांबविण्याचा, लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

-अन् वधू निघाली अल्पवयीन, लग्न पुढे ढकलले
अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरातील कल्याण मंडपम् या क्वारंटाईन सेंटरला अडकलेल्या नवरदेवाचे २५ जूनचे लग्न आता पुढे ढकलण्यात आले आहे. नियोजित वधूचे वय १७ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे होऊ घातलेला हा बालविवाह टळला आहे.
प्रशासनाकडून २५ जूनला हे लग्न लावले जाणार होते. या लग्नाची तयारी सुरू करण्यात आली होती. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार मुलाची, तर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी मुलीची बाजू सांभाळण्याचे निश्चित केले होते. भडजीसह नवरदेव नवरीचे हार आणि बुके नगरपालिकेचे करनिरीक्षक रोहन राठोड आणणार होते. नवरदेवाचे कपडे, खुर्च्या, मंडप, नाष्टा, चहा, साऊंड सिस्टीमही सांगण्यात आली होती.
दरम्यान, मुलीचे नेमके वय जाणून घेण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. वधुपक्षाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तीही जाणून घेत, वधूच्या वयाविषयी विचारपूस करण्यात आली. यात वेगवेगळी माहिती प्रशासनाला मिळाली. पण, यावर विश्वास न ठेवता प्रशासनाने त्या वधूचा शाळेकडून दाखला मिळविला. तळेगाव मोहना येथील श्री संत गुणवंतबाबा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी, उपविभागीय अधिकाऱ्यांना २४ जूनला पाठविलेल्या पत्रात त्या वधूची जन्मतारीख ७ मे २००३ दाखविली आहे. दाखल्यावरून वधूचे वय केवळ १७ वर्षे ठरत असल्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेत चालवलेली लग्नाची तयारी आता थांबविली आहे. दुसरीकडे वधूचे वय केवळ १७ वर्षे असल्यामुळे क्वारंटाईन सेंटरला अडकलेल्या नवरदेवाला व त्याच्या नातेवाइकांना लग्न थांबविण्याचा, लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
अचलपूरच्या ठिकरीपुऱ्यातील मूळ रहिवासी असलेला हा २७ वर्षीय नवरदेव मुलगा लग्नाच्या १५ दिवसांपूर्वी दिल्लीवरून १० जूनला शहरात दाखल झाला होता. कोरोनासंबंधी प्रशासकीय नियमानुसार त्याला कल्याण मंडपम्ला क्वारंटाईन करण्यात आले. २५ जूनला त्याला सुटी दिली जाणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी ११ वाजता त्याचे लग्न होते. म्हणून त्याच्या बाजूने प्रशासनाने उभे ठाकले खरे, पण नवरी अल्पवयीन निघाल्यामुळे प्रशासनाने हा विवाहच थांबविला आहे.
प्रशासनाच्या पुढाकारातून क्वारंटाईन असलेल्या नवरदेवाचे होणारे लग्न थांबविण्यात आले आहे. वधूचे वय १७ वर्षे निघाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह टळला आहे.
- रोहन राठोड, करनिरीक्षक
नगर परिषद, अचलपूर