लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गत तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी योग प्रशिक्षकांना कामावरून कमी केले आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाने काढलेल्या आदेशात निधी नसल्याचे कारण देत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे योग प्रशिक्षकांमध्ये मात्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मागील अनेक दिवसांपासून मनमानीपणे कारभार सुरू आहे. अशातच आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील आयुष्यमान आरोग्य केंद्रात मागील चार ते पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या योग प्रशिक्षकांना आरोग्य विभागाने अचानकच कामावरून कमी केले आहे. हा योग प्रशिक्षक यांना कामावरून कमी करताना आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदेशात शासनाकडून या उपक्रमासाठी निधी उपलब्ध नसल्याने आपले योग सत्र स्थगित करण्यात येत आहे, असे नमूद केले आहे.
पाच वर्षांपासून सेवेतआरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ग्रामीण भागातील आयुष आरोग्य केंद्रात योगप्रशिक्षक म्हणून गत पाच वर्षांपासून कार्य केलेल्या प्रशिक्षकांचे काम बंद केले. यामुळे योग प्रशिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
अन्यायग्रस्त योग शिक्षकांची झेडपीवर धडकयोग प्रशिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्याकडे याबाबत आपल्या समस्या मांडून न्याय देण्याची मागणी केली. यावर सुरेखा ठाकरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांची भेट घेऊन योग प्रशिक्षकांच्या प्रश्नाबाबत योग्य तोडगा काढण्याची मागणी रेटून धरली. यावेळी राहुल दोडके, उमा मदणे, ज्योती धुळे, विलास मदने, दर्शना सोनार, कल्पना राऊत, जया मदने, किसन देशमुख, शशिकांत गायकवाड, प्रशांत वाढोणकर, प्रकाश तायडे, सोनू हिरोळे, शीला काळमेघ, शंकर काळमेघ, सुशील पवार, नीलेश माहोरे, सोनू हेरोळे, आदी उपस्थित होते.