अडगळीतील सायकली निघाल्या बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:00:07+5:30
अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी शुक्रवारी नव्याने आदेश काढीत रविवारपासून दुचाकीला बंदी घातली. यात काही महत्त्वपूर्ण असलेल्यांना सूट देण्यात आली आहे. त्याच्या परिणामी रविवारी शहरात रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांसह नगरपालिका, महसूल विभागाचे कर्मचारी आणि पथक दिसून येत आहेत.

अडगळीतील सायकली निघाल्या बाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर, परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये रविवारपासून दुचाकीबंदी करण्यात आल्याने शहरात संचारबंदी लागू असल्याचे प्रकर्षाने जाणवले. अनेकांनी अडगळीतील सायकली बाहेर काढल्या, तर काहींनी आवश्यक कामासाठी पायी जाऊन बाजारपेठ गाठली. दुसरीकडे शहराला लागून असलेल्या कांडली परिसरातील टीचर कॉलनी परिसरात बडनेरा येथील एक कोरोना पॉझिटिव्ह येऊन गेल्याने शहरात दहशत पसरली आहे.
अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी शुक्रवारी नव्याने आदेश काढीत रविवारपासून दुचाकीला बंदी घातली. यात काही महत्त्वपूर्ण असलेल्यांना सूट देण्यात आली आहे. त्याच्या परिणामी रविवारी शहरात रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांसह नगरपालिका, महसूल विभागाचे कर्मचारी आणि पथक दिसून येत आहेत.
संचारबंदीत सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत देण्यात आलेली सूट पाहता, विनाकारण फिरणाºया आणि टवाळखोर मुलांची गर्दी अधिक दिसून येत होती. त्याला रविवारपासून मोठ्या प्रमाणात आळा बसला. तहसीलदार मदन जाधव, ठाणेदार सदानंद मानकर, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, अचलपूर ठाणेदार सेवानंद वानखेडे, सरमसपुरा ठाणेदार प्रकाश राऊत यांनी संचारबंदीचा मोर्चा सांभाळला.
रविवारपासून जुळ्या शहरासाठी नियम कडक करण्यात आले आहेत. दुचाकीबंदीचा परिणाम दिसून आला. अकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
-संदीपकुमार अपार
उपविभागीय अधिकारी, अचलपूर