आजपासून ग्रामीण भागातील ३३७ शाळांची वाजणार घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 05:00 IST2021-07-15T05:00:00+5:302021-07-15T05:00:41+5:30
कोरोना संसर्गामुळे गत दीड वर्षापासून या शाळा बंद होत्या. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊन नुकसानही होत आहे. आता कोराेनाची साथ कमी झाल्याने शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी होत होती. त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. महिनाभरापासून ज्या गावात गत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही, अशा गावात या शाळा सुरू होणार आहेत.

आजपासून ग्रामीण भागातील ३३७ शाळांची वाजणार घंटा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ग्रामीण भागातील ७४८ पैकी ३३७ शाळांची घंटा गुरुवार १५ जुलैला वाजणार आहे. यासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्थानिक स्तरावर आवश्यक उपाययोजनांच्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात दिल्या आहेत.
कोरोना संसर्गामुळे गत दीड वर्षापासून या शाळा बंद होत्या. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊन नुकसानही होत आहे. आता कोराेनाची साथ कमी झाल्याने शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी होत होती. त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. महिनाभरापासून ज्या गावात गत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही, अशा गावात या शाळा सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे, शाळा सुरू करण्यासाठी ग्रामस्तरावर गठित समितीने शाळा सुरू करण्याबाबत ठराव घेतला आहे, अशा ग्रामीण भागातील ३३७ गावात शाळांची घंटा वाजेल. यामुळे दीड वर्षांपासून घरी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
मार्गदर्शक सूचना : एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बेंचवर सहा फुटाच्या अंतराने, एका वर्गात कमाल १५ ते २० विद्यार्थी असावे. सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवून लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी. शिक्षकांचा निवास शक्यतो त्याच गावात असावा.
इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्याबाबत ३३७ ग्रामस्तरीय समितीचे ठराव घेतले आहेत. त्यानुसार या शाळा मार्गदर्शक सूचनेनुसार गुरुवारपासून सुरू होतील.
एजाज खान, शिक्षणाधिकारी