- हा तर मराठ्यांचा अन्यायाविरूद्ध आक्रोश !
By Admin | Updated: September 23, 2016 00:21 IST2016-09-23T00:21:45+5:302016-09-23T00:21:45+5:30
मराठा समाज एकेकाळी सधन होता. परंतु सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे हा समाज माघारत गेला.

- हा तर मराठ्यांचा अन्यायाविरूद्ध आक्रोश !
ना. प्रवीण पोटे : ११ लाख मराठ्यांचा सहभाग
अमरावती : मराठा समाज एकेकाळी सधन होता. परंतु सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे हा समाज माघारत गेला. समाजाची सर्वच क्षेत्रात पिछेहाट होत गेली. मात्र, आता या अन्यायाने परिसीमा ओलांडली आहे. ६९ वर्षांनंतर मराठा समाज जागृत झाला असून या अन्यायाविरूद्धचा आक्रोशच या ‘न भूतो न भविष्यती’ मूकमोर्चातून उफाळून आला आहे. म्हणूनच शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मंजूर कराव्यात, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सकल मराठा समाजाच्यावतीने गुरूवारी काढण्यात आलेल्या मूकमोर्चाने आजवरच्या मोर्चांचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्यायला विरोध करण्याकरिताच हा समाज रस्त्यावर उतरल्याचा पुनरूच्चार यावेळी पालकमंत्र्यांनी केला. ते म्हणाले, कधीकाळी मराठा समाज भूपती होता. परंतु आज या समाजातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोपर्डीतील घटनेने या समाजाचा संयम पूर्णपणे ढळला. यातूनच समाज एकवटला आणि या अन्यायाच्या बिजांमधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जन्मली आहे.
हा मोर्चा शासन अथवा कोणत्याही समाजाविरूद्ध नाही, ही बाब पालकमंत्र्यांनी स्पष्ट केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे शेतमालाला योग्य भाव, मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती मिळावी या मागण्यांसाठी हा मूक आक्रोश आहे, असे ते म्हणाले.
मोर्चेकऱ्यांच्या संख्येबाबत प्रशासनाकडून सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी कानोसा घेतला असता तब्बल साडेआठ लाख लोक अमरावतीत दाखल झाल्याची माहिती होती. मात्र, दुपारी २ वाजता ही संख्या ११ लाखांच्यावर पोहोचल्याचा दावा ना. पोटे यांनी केला. मोर्चा शिस्तबद्ध तितकाच लक्षणीय होता. मोर्चेकऱ्यांच्या मागणीनुसार अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याचा सूर आहे, ही बाब राज्य शासनाने मान्य करावी. सततची नापिकी, दुष्काळ आदी कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणारे ९० टक्के शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत, असे ते म्हणाले. शासनाचा प्रतिनिधी म्हणून या मोर्चाविषयी मुख्यमंत्र्यांना इत्यंभूत माहिती दिली जाईल. मराठा समाजाला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न असेल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. मराठा समाजाची शासनपूरक भूमिका असून हा मोर्चा कोणत्याही समाजाविरोधी नसल्याचे ना. पोेटे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. (प्रतिनिधी)