अंगणवाडीतील बालकांना शाळेचे दर्शन दुर्लभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:16 IST2021-06-16T04:16:49+5:302021-06-16T04:16:49+5:30

अमरावती : सर्वत्र हाहाकार माजवून सोडलेल्या कोरोना संकटाने सर्वांचेच टेन्शन वाढविले असताना शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. ...

Anganwadi children rarely see the school | अंगणवाडीतील बालकांना शाळेचे दर्शन दुर्लभ

अंगणवाडीतील बालकांना शाळेचे दर्शन दुर्लभ

अमरावती : सर्वत्र हाहाकार माजवून सोडलेल्या कोरोना संकटाने सर्वांचेच टेन्शन वाढविले असताना शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच्या पहिल्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अंगणवाडी, बालवाडीतील गतवर्षातील विद्यार्थ्यांसह यावर्षीच्याही विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचे दर्शन दुर्लभच होणार आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गेल्यावर्षी पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तसेच सत्राच्या शेवटी परीक्षा न देता पुढील वर्गासाठी ते पात्र ठरले. परंतु अंगणवाडी, बालवाडीतील विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना आपल्या हातात वही, पाटी-पेन्सिल न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. त्या सर्वांनी आपल्या शिक्षकांसह शाळेचेही वर्षभरात तोंड पाहिलेले नाही. प्राथमिक विद्यार्थ्यांना त्या वर्गाचा अभ्यास तर सोडाच परंतु शाळा व तेथील शिक्षकांची ओळख देखील न होता त्यांनी दुसऱ्या वर्गात प्रवेश केला आहे. त्यामुळे इतर पालकांची चिंता अधिक वाढली आहे. यावर्षी लहान मुलांवर कोरोनाचे भयंकर संकट ओढवणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे जूनपासून शाळा नेहमी सुरू होणे अशक्य आहे. विद्यार्थ्यांना अक्षर ओळख, अंकज्ञान व अन्य विषयाचे ज्ञान न होता त्यांना पुढील वर्गात बसविणे पालकांना धोक्याचे वाटते. ऑनलाईन शिक्षणाचा विचार केल्यास ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांना अद्याप अँड्रॉईड मोबाइल उपलब्ध झालेला नाही. हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. ते मोबाईल विकत घेऊ शकत नाहीत. प्रत्येक गावात मोबाईलची रेंज नाही. असे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहापासून वर्षभर तरी दूर आहेत. वर्गातील प्रत्यक्ष शिक्षण व ऑनलाईन शिक्षणात फरक पडत असून प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणापेक्षा मोबाईलवरील खेळ व अनेक गोष्टीत अधिक रस वाटतो. पालक व शिक्षकांचे लक्ष चुकवून ते अशा गोष्टी करीत असतात. आनलाईन शिक्षण त्यांच्या पचनी पडण्यासाठी काही अवधी लागेल.

कोट

माझा मुलगा मागील वर्षी पहिलीत गेला. तो शाळेत न जाता पास झाला. आता यावर्षी शाळेची व शिक्षकांची ओळखही न होता तो दुसरीत जाईल. त्याच्या ज्ञानाचे काय?

अतुल कावरे, पालक

Web Title: Anganwadi children rarely see the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.