अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १० मेपर्यंत रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 20:50 IST2021-04-26T20:49:50+5:302021-04-26T20:50:53+5:30
Amravati news कोरोनाचा कहर आणि कडक लॉकडाऊनमुळे अमरावती-मुंबई एक्स्प्रेसची फेरी २७ एप्रिल ते १० मे अशी १४ दिवस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईहून अत्यावश्यक कामासाठी ये-जा करण्यासाठी आता अमरावतीकरांना पर्यायी रेल्वे गाडीने प्रवास करावा लागणार आहे.

अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १० मेपर्यंत रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचा कहर आणि कडक लॉकडाऊनमुळे अमरावती-मुंबई एक्स्प्रेसची फेरी २७ एप्रिल ते १० मे अशी १४ दिवस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईहून अत्यावश्यक कामासाठी ये-जा करण्यासाठी आता अमरावतीकरांना पर्यायी रेल्वे गाडीने प्रवास करावा लागणार आहे.
मुंबई मार्गे ये-जा करण्यासाठी पश्चिम विदर्भात रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला खरी उतरलेली आणि एरवी नियमित हाऊसफुल्ल धावणारी अमरावती-मुंबई एक्स्प्रेस कोरोना संसर्गामुळे १५ दिवसांपासून रिकामी धावत आहे. कडक लॉकडाऊनमुळे प्रवाशांनी मुंबईचा प्रवास कमी केला आहे. त्यामुळे या गाडीच्या आरक्षणाची मागणी मंदावली. दररोज निम्मे बर्थ रिकामे घेऊन मुंबई एक्स्प्रेस धावत होती. ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा मुंबई एक्स्प्रेसचा कारभार सुरू असल्याने मध्य रेल्वे मुंबई विभागाने या रेल्वेला १४ दिवस ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने रेल्वे अधिकाऱ्यांचे पत्र अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचले आहे. परिणामी मे महिन्यातील आरक्षणाचे रिफंड मिळणार आहे. सोमवारी मुंबई एक्स्प्रेसमध्ये १३५० पैकी ७४१ आरक्षित तिकिटांवर प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रबंधक महेंद्र लोहकरे यांनी दिली.