घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
By गणेश वासनिक | Updated: September 13, 2025 15:06 IST2025-09-13T15:03:54+5:302025-09-13T15:06:04+5:30
Amravati : महापालिका आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांनी ‘मीट द प्रेस’मध्ये उलगडला जीवनप्रवास

A 'top to bottom' doctor at home; but became an IAS officer and entered public service...
अमरावती : घरात आजोबा, आई-वडील आणि भाऊ, अशी डॉक्टरांची फौज होती. एवढेच नव्हे, तर आजी प्राचार्य होती. कुटुंबातील अनेकांना वाटायचे की मीसुद्धा डॉक्टर व्हावे. पण नियतीच्या मनात काही औरच होते. विधी पदवीच्या अभ्यासक्रमात प्रवेश असताना, शेवटच्या वर्षात यूपीएससी परीक्षा दिली अन् पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन आयएएस झाली, असा आगळावेगळा जीवनप्रवास अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांनी शुक्रवारी ‘मीट द प्रेस’मध्ये बोलताना उलगडला.
मूळ दिल्ली येथील रहिवासी असलेल्या सौम्या शर्मा यांचे पती अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक हे आहेत. हैद्राबाद येथील प्रशिक्षण काळात अर्चित चांडक यांच्याशी भेट झाली नि कालातंराने या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे लग्नबंधनात अडकले. त्यांंना एक मुलगा आहे. आईकडून प्रेरणा मिळाली. वृत्तपत्र वाचनाची आधीच गोडी होती. त्यातच विधी अभ्यासक्रमाचा आधार या सर्व घडामोडी यूपीएससीची तयारी करताना कामी आल्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्यासाठी ‘नीट’साठी अर्ज केला. पण परीक्षा दिली नाही. परंतु कुटुंबीयांशी चर्चा करून २ जून २०१७ मध्ये यूपीएससी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार लोकसेवेत जाण्याचा मार्ग निवडला. १९ फेब्रुवारी २०१८ रोजी एआयआर रँक घोषित झाले. २०१९ ते २०२२ या दरम्यान दिल्ली येथे एसडीजीएम म्हणून
कोरोना काळात कारभार हाताळला. नंतर महाराष्ट्र कॅडेर मिळाले. २०२२ मध्ये नांदेडच्या देगलुर येथे पहिली पोस्टींग मिळाली. त्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात सीईओ आणि आता १७ जून २०२५ पासून अमरावती महापालिका आयुक्तपदाची धुरा सांभाळत आहेत. आयएएस झाली तेव्हा अवघ्या २२ वर्षांची होते, असे त्यांंनी सांगितले. जे चांगले ते माझ्यासाठी आदर्श आहे, असे आयुक्त शर्मा म्हणाल्या.
स्वच्छता, स्मशानभूमी, उद्यानावर फोकस
अमरावती महानगरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे, तो प्राधान्याने सोडविण्याचे अभिवचन त्यांनी दिले. तसेच घनकचरा व्यवस्थापन, उद्यानाचा विकास, आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे, छत्री तलावाचा विकास, शाळांचा सुधार, हॉकर्स झाेन, वाहनतळ, पे ॲन्ड पार्क, मनुष्यबळासह अन्य प्रश्न, समस्यांवर आयुक्त शर्मा यांचा फोकस होता.