५.१३ कोटी वसुलपात्र, ३० हजारांचीच वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST2020-12-17T04:39:48+5:302020-12-17T04:39:48+5:30
अमरावती : आयकराचा भरणा करताना जिल्ह्यातील ५,७४५ शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या ५ कोटी १३ लाख ७६ हजारांच्या ...

५.१३ कोटी वसुलपात्र, ३० हजारांचीच वसुली
अमरावती : आयकराचा भरणा करताना जिल्ह्यातील ५,७४५ शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या ५ कोटी १३ लाख ७६ हजारांच्या निधीचा लाभ घेतला आहे. या निधी परत घेण्यासाठी महसूल विभागाद्वारा तलाठ्यामार्फत आता या शेतकऱ्यांना निधी परत देण्यासाठी नोटीस बजावली आहे. आतापर्यंत फक्त धारणी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांच्या १५ हप्ताचे ३० हजार रुपये जिल्हाधिकारी कार्यालयास परत मिळाले आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. जिल्ह्यात या योजनेचे ३ लाख ३३ हजार ९११ लाभार्थी आहेत. या योजनेच्या आतापर्यंत दोन हजारांचे प्रत्येकी सहा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. या प्रक्रियेत लाभार्थी हा खरा शेतकरीच आहे, ही खातरजमा ऑनलाईन प्रक्रियेत झाली नसल्याने आयकर भरणाऱ्या ६ हजार ४१३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात साधारणपणे ५.१३ कोटी रुपये जमा झाल्याची बाब आात उघडकीस आल्याने महसूल विभागाद्वारा ही रक्कम वसुल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. याशिवाय अनेक अपात्र शेतकऱ्यांच्याही खात्यात हे हप्ते जमा झाले आहेत. याशिवाय काही पात्र शेतकऱ्यांची मदत अन्य खात्यात जमा झाल्याच्याही तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. काही प्रकरणांत मृत खातेदारांच्या खात्यात निधी जमा झालेला आहे. यासाठी केंद्र शासनाने एसओपी पाठविली त्यानूसार आता निधी परत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्याच्या कृषी आयुक्तालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सुचना जिल्हास्तरावर दिल्या आहेत.
पॉइंटर
*पेंन्शन योजनेसाठी जिल्ह्यातील पात्र शेतकरी ३,३३,९११
*शेतकऱ्यांना वसुलीसाठी नोटीस ५,७४५
* आतापर्यंत शेतकऱ्यांकडून वसूल रक्कम ३०,०००
* शेतकऱ्यांकडून वसुल करणे अद्याप बाकी ५,१३,४६,०००
बॉक्स
वसुलीची प्रक्रिया सुरू
जिल्ह्यातील १४ तालुक्यांत आयकर भरत असताना योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नोटीस बजावणे व रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सद्यस्थितीत धारणी तालुक्यातील ३ शेतकऱ्यांकडून १५ हप्तांची ३० हजारांची रक्कम वसुल करण्यात आलेली आहे. इतर तालुक्यातही नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सद्यस्थितीत ४० टक्क्यांवर रक्कम तालुकास्तरावर वसुल करण्यात आली असली तरी जिल्हा कायार्लयात जमा करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
सातबाऱ्यावर बोजा चढविणार
आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील रक्कम वसुलीसाठी महसूल विभागाद्वारा फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटीस बजावल्या जात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी असहकार्य केले त्यांच्यावर आरआरसीद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी न जुमानल्यास त्यांच्या सातबारावर बोजादेखील चढविला जाणार आहे. बोजा कमी करण्याच्या वेळी सर्व रक्कम वसुल केली जाणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.