वर्षभरात ५०७ बालकांचा मृत्यू
By Admin | Updated: May 3, 2017 00:19 IST2017-05-03T00:19:34+5:302017-05-03T00:19:34+5:30
कुपोषणाचा कलंक लागलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वर्षभरात ० ते ६ वयोगटातील ५०७ बालकांचा मृत्यू झाला.

वर्षभरात ५०७ बालकांचा मृत्यू
मेळघाटात कुपोषणाचे तांडव : २२ मातामृत्यू, १८० बालके जन्मत:च दगावली
चिखलदरा : कुपोषणाचा कलंक लागलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वर्षभरात ० ते ६ वयोगटातील ५०७ बालकांचा मृत्यू झाला. डोळे उघडून जग पाहण्यापूर्वीच १८० उपजत बालकांसोबत २२ माता मृत्यूंचीही नोंद झाल्याने मेळघाटातील वास्तव पुन्हा एकदा कुपोषणाचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या माहितीची नोंद शासन दरबारी झाली आहे.
१ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या वर्षभराच्या कालावधीत मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात ० ते ६ वयोगटातील ५०७ बालकांनी कुपोषणामुळे मृत्यूला कवटाळले, तर १८० उपजत बालकांचा मृत्यू होण्यासोबत २२ आदिवासी मातांनासुद्ध पोषणाअभावी मृत्यूला जवळ करावे लागले.
येथील आदिवासीबहुल अतिदुर्गम परिसर पाहता येथील आदिवासांनी मूलभूत सविधा मिळाव्यात, यासाठी आरोग्य यंत्रणा, अंगणवाडी आदी यंत्रणा शासनातर्फे कार्यरत असताना वर्षभरात ० ते ६ अशा एकूण ६८७ बालकांचा मृत्यू झाला आहे. दहा वर्षांत हेच चक्र सुरू आहे. मेळघाटात समाविष्ठ असलेल्या धारणी व चिखलदरा तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनातर्फे दिला जातो. यासह येथे आरोग्य विकासाच्या दृष्टिकोनातून विविध योजना राबविल्या जातात. मात्र, आदिवासी खेड्यापर्यंत त्या पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणेचा हलगर्जीपणामुळे येथील परिस्थिती दुुरुस्त झाली नसल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)
७९ बालके कुपोषित
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात ० ते ६ वयोगटातील ३४,८६४ बालकांपैकी ३०,७९४ बालकांचे वजन घेण्यात आले. त्यापैकी सर्वसाधारण श्रेणीत २५,९७३ बालक असून तीव्र कुपोषीत (मॅम) ७४२ तर अतीतीव्र कुपोषित (सॅम) ७९ बालकांचा समावेश असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. या ७९ बालकांना जलजन्य व इतर आजारापासून वाचविण्याची नितांत गरज आहे.
‘खोज’मध्ये झाली बैठक
वर्षभरात मोठ्या प्रमाणात बालमृत्यूचा आकडा फुगल्याने मेळघाटात कार्यरत स्वयंसेवी संस्था खोजतर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन संस्थेचे बंड्या साने यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. यावेळी सुनील कास्देकर, रामबाबू दहीकर, शारदा घीरे, सोमेश्वर चांदूरकर, शशीकांत बळीद सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बालमृत्यूच्या विविध कारणांसह त्यावर उपाययोजनेविषयी चर्चा करीत पुढील बैठक २४ मे रोजी घेण्याचे ठरविण्यात आले. प्रशासनासोबत काम करून बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.
मागील वर्षभरात ५०७ बालक ० ते ६ तर १८० उपजत आणि २२ माता मृत्यू झाले. मागील दहा वर्षांअगोदरप्रमाणे ही आकडेवारी धक्का देणारी आहे. प्रशासनाने तत्काळ लक्ष देत समन्वयाने कार्य करण्याची गरज आहे. स्वयंसेवी संस्था म्हणून आम्ही कार्य करीत आहोत. त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
- बंड्या साने,
खोज संस्था, मेळघाट