पाणीपुरवठ्यात ३५ टक्के गळती
By Admin | Updated: July 8, 2014 23:12 IST2014-07-08T23:12:06+5:302014-07-08T23:12:06+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अंबानगरीला पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा करताना ३५ टक्के पाण्याची गळती होत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. एकीकडे पाणी वाचविण्यासाठी ‘पाणी हेच जीवन आहे’,

पाणीपुरवठ्यात ३५ टक्के गळती
हजारो लिटर पाण्याची नासाडी : जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्ष
वैभव बाबरेकर - अमरावती
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अंबानगरीला पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा करताना ३५ टक्के पाण्याची गळती होत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. एकीकडे पाणी वाचविण्यासाठी ‘पाणी हेच जीवन आहे’, असे घोषवाक्य जाहीर करताना पाणी वाचविण्यात खुद्द जीवन प्राधिकरणच अपयशी ठरल्याचे चित्र आहे.
मोर्शीजवळील सिंभोरा धरणातून अमरावती शहराला पाणीपुरवठा केला जातो. सुमारे २३ किलोमिटरच्या पाईपलाईनद्वारे हा पाणीपुरवठा अमरावती शहरातील मार्डी मार्गावर जल शुध्दीकरण केंद्रापर्यंत केला जात आहे. त्या ठिकाणी पाणी शुध्दीकरणाची प्रक्रिया पुर्ण होऊन अमरावतीकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा होत आहे. दररोज हजारो लिटर पाणी पाईप लाईनद्वारे ग्रॅव्हीटी पध्दतीने शहरवासियाच्या घरापर्यंत पोहचविले जात आहे. मात्र यातून ३५ टक्के गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईन लिकेज, सार्वजनिक नळ व पाणी चोरीचाही समावेश आहे.
महापालिकेकडून सर्वाधिक पाण्याची नासाडी
महापालिकेच्या नावे जीवन प्राधिकरणाकडून नळजोडणी देण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिकेतंर्गत येणारे कार्यालये, शाळा व सार्वजनिक नळाचा समावेश आहे. यासर्व ठिकाणी अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा सुरु आहे. याकरिता दरमहिन्याला २७.५ लाखांचे देयक महापालिकेकडे थकित आहे. आतापर्यंत थकित देयकांची रक्कम ६१ कोटींपर्यंत पोहोचली आहे. महापालिकेच्या नावे सुमारे १ हजाराच्यावर सार्वजनिक नळजोडणी आहे. त्यातील अनेक ठिकाणी नळाला तोट्या नाहीत. महापालिकेच्या नावे असलेल्या नळ कनेक्शनमधून सर्वाधिक पाण्याची नासाडी होत आहे.