चांदूरबाजारमध्ये शेतकऱ्यांना ३० कोटींचा फटका
By Admin | Updated: July 24, 2014 23:38 IST2014-07-24T23:38:59+5:302014-07-24T23:38:59+5:30
मंगळवारच्या अतिवृष्टीने चांदूरबाजार तालुक्याीतल सातही मंडळात संत्रा व खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. यात शेतकऱ्यांना ३० कोटींच्यावर आर्थिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

चांदूरबाजारमध्ये शेतकऱ्यांना ३० कोटींचा फटका
सुरेश सवळे - चांदूरबाजार
मंगळवारच्या अतिवृष्टीने चांदूरबाजार तालुक्याीतल सातही मंडळात संत्रा व खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. यात शेतकऱ्यांना ३० कोटींच्यावर आर्थिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
नदी व नाल्या काठच्या सर्व शेतांमधील खरीप पिके खरडून गेली आहेत. तर बहुतांश संत्रा बागांमधील संत्र्यांची झाडेच उपटून गेली आहेत. संत्रा झाडावरील आंबिया संत्रा बहराची फूट हजारोंच्या संख्येत गळून पडली आहेत. काही ठिकाणी पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहेत. तालुक्यात ५८ हजार ५४० पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ४१हजार ३४२ हेक्टर जमिनीत ज्वारी ७३ हेक्टर, तूर ५५९९, सोयाबीन १८४८९, कापूस १६९१३ तर २६८ हेक्टर इतर पिकांची पेरणी झाली असून या बियाण्याला समाधानकारक अंकूर फुटले होते. तर संत्र्याच्या आंबिया बहराची फळधारणाही झाली होती. बुधवारी तालुक्यातील सर्व सातही मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व संत्रा उत्पादकांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे.
जसापूर येथील कोरडे व टिंगणे यांच्यासह अनेक संत्रा उत्पादकांच्या बागेतील संत्रा झाडे उन्मळून पडली. तर जालनापूर येथील रमेश मेहरे यांच्या संत्रा बागेतील ११ झाडे उन्मळून पडली आहेत. काही शेतातील खरिपाची पेरणीच खरडून गेली आहे.
काहींच्या शेतात अद्यापही तलाव साचले आहेत. नदीकाठच्या गावात शिरजगाव कसबा, देऊरवाडा, काजळी, ब्राम्हणवाडा थडी, चिंचोली कोदोरी, थुगाव पिंप्री, टोंगलापूर, कुरळ, फुबगाव, सर्फापूर, हिरूर, धानोरा, राजना, तामसवाडी, तळणी, विरूळ, आसेगाव या शिवारातील शेतजमिनीत नुकसानीचे प्रमाण अधिक आहे.
नाल्याकाठच्या गावात चांदूरबाजार, शिरजगाव बंड, आखतवाडा, बेलोरा, राजुरा, तळवेल, सोनोरी, जालनापूर, घाटलाडकी, गणोजा, करजगाव, तळेगाव मोहना, बेलज, जसापूर, बोरगाव मोहना, रामापूर, लाखनवाडी या शिवारातील शेतजमिनी खरडून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. गुरूवारीदेखील चांदूरबाजार २३.३९ मि.मी.पावसाची नोंद झाली असून एकूण पाऊस ३५८.२४ मि.मी. झाला आहे.