२० तलाठी कार्यालयांची ‘बत्ती गूल’
By admin | Published: April 28, 2017 12:12 AM2017-04-28T00:12:28+5:302017-04-28T00:12:28+5:30
नागरिकांची गैरसोय होऊ नये, शेतकऱ्यांना गरज भासल्यास शासकीय कागदपत्रांची पूर्तता वेळेवर व्हावी,
![20 booths 'booths' | २० तलाठी कार्यालयांची ‘बत्ती गूल’ 20 booths 'booths' | २० तलाठी कार्यालयांची ‘बत्ती गूल’](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/default-image_201704447.jpg)
२० तलाठी कार्यालयांची ‘बत्ती गूल’
वर्षभरापासून वीजपुरवठा खंडित : वीज देयकांसाठी तरतूद केव्हा?
नांदगाव खंडेश्वर : नागरिकांची गैरसोय होऊ नये, शेतकऱ्यांना गरज भासल्यास शासकीय कागदपत्रांची पूर्तता वेळेवर व्हावी, यासाठी शासनाने अनेक ठिकाणी स्वतंत्र तलाठी कार्यालये उभारली आहेत. परंतु या कार्यालयात वीज पुरवठ्यासाठी शासनाने कोणतीही तरतूद न केल्याने वीज बिल न भरल्याने वर्षभरापासून तालुक्यातील २० तलाठी कार्यालयांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे.
अनेक ठिकाणचे मीटरसुद्धा काढण्यात आल्याने प्रचंड उन्हाच्या कडाक्यात तलाठ्यांची प्रचंड दमछाक होत आहे. शासनाने कोट्यवधी रूपये खर्चून तालुक्यात नांदगाव खंडेश्वर, धानोरा गुरव, पापळ, वाढोणा रामनाथ, पिंप्री गावंडा, पिंप्री निपाणी, सावनेर, तळेगाव, मंगरूळ चव्हाळा, शिवणी, शिरपूर, सालोड, लोहगाव इत्यादी ठिकाणी तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारती तयार करण्यात आल्यात. यापैकी अनेक कार्यालयात वर्षभरापूर्वी मीटर बसविण्यात आलेत. पण, वर्षभरात वीज देयकाची रक्कम न भरल्याने महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करून मीटर काढून नेले.
काही ठिकाणी सहा महिन्यांपासून वीज देयक न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. याबाबत तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता तलाठी कार्यालयाच्या वीज देयकांसाठी तरतूदच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे बांधकामासाठी पैसा आहे. परंतु वीज देयके भरण्यासाठी नाही, अशी अवस्था तहसील कार्यालयांची झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)