१४ हजार शेतकऱ्यांचे नुकसान सूचना अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST2019-11-03T06:00:00+5:302019-11-03T06:00:58+5:30
खरिपातील सोयाबीन, ज्वारीचा हंगाम अन् कपाशीच्या वेचणीची सुरवात होत असतानाच्या काळातच दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने किमान दीड लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान प्रधानमंत्री विमा योजनेच्या निकषात समाविष्ट असल्याने शेतकऱ्यांना विमा परतावा लाभ मिळू शकतो. मात्र, त्याकरिता नुकसानाच्या ७२ तासांत पीक नुकसान सूचना अर्ज विमा कंपन्यांला सादर करावे लागतात.

१४ हजार शेतकऱ्यांचे नुकसान सूचना अर्ज दाखल
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दहा दिवसांच्या अवकाळीने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरमधील खरीप पिके बाधित झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा परतावा मिळावा, यासाठी पीक नुकसानाबाबत ७२ तासांच्या आत कंपनीला कळविणे आवश्यक आहे. या अनुषंगाने शुक्रवारपर्यंत १४ हजार ६०३ शेतकऱ्यांचे पीक नुकसान सूचना अर्ज कंपनीला प्राप्त झाले. जिल्ह्यात यंदा १.९२ लाख शेतकऱ्यांनी पीकविम्यात सहभाग नोंदविला असताना, भरपाईसाठी अर्जाचे प्रमाण नगण्य आहे.
खरिपातील सोयाबीन, ज्वारीचा हंगाम अन् कपाशीच्या वेचणीची सुरवात होत असतानाच्या काळातच दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने किमान दीड लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान प्रधानमंत्री विमा योजनेच्या निकषात समाविष्ट असल्याने शेतकऱ्यांना विमा परतावा लाभ मिळू शकतो. मात्र, त्याकरिता नुकसानाच्या ७२ तासांत पीक नुकसान सूचना अर्ज विमा कंपन्यांला सादर करावे लागतात. कंपनीचे तालुका किंवा जिल्हा प्रतिनिधींकडे किंवा ई-मेलद्वारे पीक विमा हप्ता भरल्याच्या पुराव्यासह विमा कंपनीकडे किंवा १८००११६५१५ या क्रमांकावर संपर्क साधून ही प्रक्रिया करावी लागते.
ज्या शेतकऱ्यांची शेती पावसामुळे जलमय होऊन कापणी केलेल्या पिकाचे किंवा उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्यांनी नुकसानाची माहिती पिकांची नोंद असलेला सात-बारा व पीक विमा भरल्याच्या पुराव्यासह विमा कंपनीच्या संबंधितांकडे तसेच विमा हप्ता भरलेल्या बँकेकडे, महसूल किंवा कृषी विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्याकडे, कृषी सहायक, तलाठी, कृषी पर्यवेक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे कळविणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांना याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ८८५ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पीक नुकसान सूचना अर्ज सादर केले आहेत. मात्र, जिल्ह्यात अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत अर्जदारांची संख्या नगण्य आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात कर्जदार व गैरकर्जदार या दोन्ही प्रवर्गात १,९२,०१० शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरला होता.
प्रपत्रानुसार गोषवारा आवश्यक
विमा योजनेच्या निकषानुसार नुकसानभरपाईचा गोषवारा हा प्रपत्रानुसार विमा कंपनीच्या सहकार्याने तयार करण्याचे निर्देश राज्याच्या कृषी आयुक्तांनी शनिवारी सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदविला व अर्ज केले आहेत, अश्या अर्जाची तपासणी वैयक्तिकरीत्या करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी यामध्ये स्पष्ट केले आहे.
गावनिहाय याद्या कराव्या-कृषी आयुक्त
शेतकºयांचे विमा कंपनीकडे सादर अर्जाची तालुकानिहाय यादी करावी व गावस्तरावर नेमुक दिलेल्या सर्वेक्षण समितीकडे सुपूर्द करावी. क्षेत्रीय पंचनाम्याकरिता विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित राहतील. अनुपस्थित राहिल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरावे लागतील, अशी तंबी कृषी आयुक्तांनी विमा कंपन्यांना शनिवारी दिली. कोणत्याही परिस्थितीत सर्व अर्जाची क्षेत्रीय तपासणी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ही आहे योजनेच्या निकषातील तरतूद
पंतप्रधान पीक विमा योजनेच्या परिच्छेद क्रमांक ७.५ मध्ये कापणी करून ठेवलेल्या पिकांचे काढणीपश्चात अवकाळी पावसामुळे नुकसानासाठी वैयक्तिक स्तरवर पंचनामे करून विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. मात्र, अशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत सदर विमा कंपनीकडे, कंपनीच्या तालुका किंवा जिल्हा प्रतिनिधीकडे तसेच टोल फ्री क्रमांकावर सादर करणे महत्त्वाचे आहे.