स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी १४ सुपुत्रांचे बलिदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:17 IST2017-08-14T23:17:09+5:302017-08-14T23:17:26+5:30
बलिदान अन् संघर्षातून साकारलले भारताचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी देशाच्या सीमेवर सैन्यातील जवान २४ तास खडा पहरा देत आहेत.

स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी १४ सुपुत्रांचे बलिदान
मोहन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती / धामणगाव रेल्वे : बलिदान अन् संघर्षातून साकारलले भारताचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी देशाच्या सीमेवर सैन्यातील जवान २४ तास खडा पहरा देत आहेत. स्वातंत्र्याचे मोल जोपण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील १४ वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.
१५ आॅगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशावर अनेक हल्ले करून स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न शत्रू राष्ट्रांनी केला. १९६५ सालच्या भारत-चीन युद्धापासून अलीकडच्या कारगील युद्धातही अमरावतीच्या जवानांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. जिल्ह्यातील १४ जवान, तर धामणगाव तालुक्यातील आजनगाव व पिंपळखुटा येथील दोन जवान यापूर्वी शहीद झाले आहेत़ विशेष म्हणजे, एकट्या धामणगाव तालुक्यातून आतापर्र्यंत १०५ पुत्रांनी देशसेवेसाठी सैन्यात प्रवेश घेऊन सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावली, तर सद्यस्थितीत जिल्ह्यातील ५५० हून अधिक युवक सैन्यात दाखल असून देशसेवा करीत आहेत, अशी माहिती सैन्य अधिकारी धनंजय सदाफळे यांनी दिली.
जन्म देणाºया आईपेक्षा भारत मातेला अधिक सन्मान देणारे सीमेवर धामणगाव तालुक्यातील १०५ सैनिक आहेत़ उत्तरपूर्व, सागरी सीमा असलेल्या त्रिकोणी भागात भारतीय संरक्षण खात्यातील तीनही विभागात धामणगाव तालुक्यातील सैनिक कार्यरत आहेत़ सावळा व निंबोली हे गाव आजही सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते़ सावळ्यातील चिकटे कुटुंबातील दोन सदस्य सैनिकांचे कार्य पार पडत आहेत, तर निंबोली येथील विशाल प्रशांत वैरागडे, विजय बढीये, ठाकरे, कैकाडे, बुटले, कुºहडकर, यांच्यासह अनेक तालुक्यातील गावांमधील सैनिक देशसेवेचे कर्तव्य बजावत आहेत़
धामणगाव शहरातील तब्बल अकरा, तर मंगरूळ दस्तगीर येथील आठ सैनिकांनी आपले आयुष्य देशसेवसाठी वेचले आहे. शेंदुरजना खुर्द, काशीखेड, आसेगाव, निंभोरा बोडका, वरूड बगाजी, ढाकुलगाव, रायपूर कासरखेड, वकनाथ, नारगावंडी, बोरगाव निस्ताने, पिंपळखुटा, झाडगाव, वाढोणा येथील तरूण सैन्यात भरती झाले आहेत.
स्वातंत्र्य लढ्यात कावलीचेही योगदान
तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे असलेल्या कावली या गावाचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान राहिले आहे़ सन १९४२ मध्ये स्वातंत्र्य लढ्याचा संग्राम सुरू असताना येथील गुलाबराव झाडे, देवराव इंगळे यांनी 'चले जाव'चा नारा देत मोठा मोर्चा काढला होता़ त्यावेळी इंग्रजांच्या गुलामी विरूद्ध मोठी चळवळ झाडे व इंगळे या स्वातंत्र्य सैनिकांनी उभारली होती़