१३७ कोटींचा संत्रा मातीमोल
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 11, 2024 17:36 IST2024-05-11T17:36:29+5:302024-05-11T17:36:57+5:30
शासनाला अहवाल : मतदान प्रक्रियेनंतर आटोपले बाधित पिकांचे पंचनामे

137 crore worth of orange wasted
अमरावती : अवकाळीचा कहर सुरूच असला तरी एप्रिल महिन्यातील नुकसानाचे पंचनामे आता आटोपले आहेत. यामध्ये सर्वाधिक १३७ कोटींचे नुकसान संत्रापिकाचे झालेले आहे. या आपत्तीमध्ये ६४ हजार शेतकऱ्यांच्या ४५ हजार हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे १५५ कोटींचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल आहे.
लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात महसूल व कृषी विभागाची क्षेत्रीय यंत्रणा व्यस्त होती. त्यामुळे गारपीट व अवकाळी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे रखडले होते. मतदान प्रक्रियेनंतरही पंचनामे सुरू न झाल्याने ‘लोकमत’द्वारा जिल्हा प्रशासनाचा लक्षवेध करण्यात आला होता. त्यानंतर पंचनाम्याला गती आली व विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शासनाकडे निधीची मागणी केली आहे.
प्राथमिक अहवालात जिरायती पिकांचे नुकसान दाखविण्यात आले असले, तरी पंचनाम्यात मात्र निरंक आहे. याशिवाय २० हजार शेतकऱ्यांच्या ६६५६ हेक्टरमधील बागायती पिकांचे १७.९७ कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. याशिवाय ४४७३९ शेतकऱ्यांच्या ३८ हजार हेक्टरमधील फळपिकांचे १३६.६८ कोटींचे नुकसान झालेले आहे. या आपत्तीमध्ये एकूण ६४७४८ शेतकऱ्यांच्या ४४६५० हेक्टरमधील पिकांचे १५४.७८ कोटींचे नुकसान झालेले आहे.