वारा येताच होतो वीजपुरवठा खंडित
By Admin | Updated: May 11, 2014 22:05 IST2014-05-11T21:58:27+5:302014-05-11T22:05:37+5:30
साखरडोह वीज उपकेंद्राचा अजब कारभार ; ग्रामस्थांना होतोय नाहक त्रास

वारा येताच होतो वीजपुरवठा खंडित
साखरडोह : ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र असलेल्या साखरडोह येथील उपकेंद्रातून १२ ते १४ गावांना विद्युत पुरवठा केल्या जातो. परंतु कोणत्याही वेळेला वीजपुरवठा सुरु व बंद होत असल्यामुळे ग्रामस्थ चांगलेच त्रासले आहेत. सध्या वारा आला की लाईन गेली, अशी परिस्थिती झालेली आहे. दोन दिवसापूर्वी आलेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांना रात्रभर अंधारातच राहावे लागले. रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यास तो सुरुच करीत नाहीत. असा गावातील नागरिकांचा अनुभव आहे. विद्युत पुरवठा करणार्या तारेवरच्या मार्गात येणार्या झाडांच्या फांद्या तोडणे आवश्यक असताना याकडे मात्र महावितरणचे कर्मचारी दुर्लक्ष करताना दिसत आहे. विद्युत पुरवठा करणार्या तारा झाडामधून जात असल्यामुळे झाडांना या फांद्याचा स्पर्श झाला की, पुरवठा खंडित होतो. तसेच साखरडोह गावाला विद्युतपुरवठा करणारे विद्युत रोहित्र खराब झाले आहे. त्यामध्ये फ्युज या पन्नाच दिसत नाही. मागील वर्षी आलेल्या वारा व पावसामुळे विद्युत पोल खाली पडण्याच्या स्थितीत आले आहे. यावर्षी हरभरा, गहू पिकविणार्या शेतकरी बांधवांनी त्याला काठीचा आधार दिला हे पोल उन्हाळय़ात दुरुस्त न झाल्यास पावसाळय़ात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल. तारा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात ढिल्या झालेल्या आहेत. त्या सुद्धा व्यवस्थित करणे आवश्यक असताना त्याकडे महावितरणच्या कर्मचार्यांचे दुर्लक्ष होत आहे. रोडवर व विद्युत उपकेंद्र असलेल्या गावातील विद्युत पुरवठय़ाची अवस्था अशा प्रकारची असेल तर दुसर्या गावची काय स्थिती असेल असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.