अकोट-नांदेडदरम्यान रेल्वे सेवाला ग्रीन सिग्नल केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:16+5:302021-06-18T04:14:16+5:30
उत्तर भारताला दक्षिणेशी जोडणारा सर्वात जवळचा रेल्वेमार्ग असलेल्या खंडवा-अकोला-नांदेड रेल्वेमार्गावर अकोला ते खंडवामार्गे महूपर्यंत मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम ...

अकोट-नांदेडदरम्यान रेल्वे सेवाला ग्रीन सिग्नल केव्हा?
उत्तर भारताला दक्षिणेशी जोडणारा सर्वात जवळचा रेल्वेमार्ग असलेल्या खंडवा-अकोला-नांदेड रेल्वेमार्गावर अकोला ते खंडवामार्गे महूपर्यंत मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. या मीटरगेज रूपांतरणाच्या कामात अकोला ते अकोटदरम्यान रूपांतरणाचे काम पूर्ण झाले असून, २०१९ मध्ये रेल्वेमार्गाची पाहणी केल्यानंतर रेल्वे विभागाने १९ मे २०१९ रोजी वेगात इंजिन चालवून ट्रॅकच्या सुरक्षिततेची तपासणी केली होती. ज्यामध्ये रेल्वेमार्ग वाहतुकीस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र रेल्वे सुरक्षा विभागाकडूनही देण्यात आले होते. सुरक्षा विभागाने वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर नियमांनुसार पहिल्या टप्प्यात अकोट ते अकोलादरम्यान मालगाड्या धावू लागल्या. गेल्या अनेक महिन्यांपासून अकोला ते अकोटदरम्यान अनेक मालगाड्यांची ये-जा झाली. मात्र दोन वर्षांपासून केवळ मालवाहू गाड्यांची वाहतूक सुरू असून, दक्षिण मध्य रेल्वेने आजवर प्रवासी गाड्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे अकोला ते अकोटमार्गे तुकईथळ, अमला खुर्द अशा १४ रेल्वेस्थानकांवर एकंदरीत प्रवास करणाऱ्या सुमारे दहा लाख रेल्वे प्रवासी गेल्या चार वर्षांपासून प्रवासी गाड्यांपासून वंचित राहिले आहेत. अकोला-खंडवा मीटरगेज ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी १ जानेवारी २०१७ पासून अकोला ते खंडवादरम्यानची रेल्वे वाहतूक बंद होती.
गेज रूपांतरणाचे काम तीन टप्प्यात
अकोला ते खंडवादरम्यान १७४ किमीचे गेज रूपांतरणाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जात आहे. या मार्गावर खंडवा ते अमला खुर्ददरम्यान ५३ किमी आणि अमला खुर्द ते अकोटदरम्यान ७७ किमी प्रगतिपथावर आहे. पहिल्या टप्प्यात अकोला ते अकोटदरम्यान ४४.७९ किमीचे गेज रूपांतरण झाले होते. रेल्वे सुरक्षा विभागाने दोन वर्षांपूर्वी सुरक्षा तपासणी केली आणि सुरक्षा प्रमाणपत्रही दिले. तेव्हापासून बऱ्याच मालगाड्या चालविण्यात आल्या आहेत. मात्र प्रवासी रेल्वे नसल्याने दहा लाख नागरिक प्रवासापासून वंचित राहिले आहेत.
रेल्वे सुरू करा
अकोला रेल्वेस्थानकात अनेक गाड्या थांबतात. ज्यामध्ये अकोला आणि अकोला-काचीगुडा इंटरसिटीकडे जाणारे प्रवासी अकोटपर्यंत सहज नेता येतात. शिवाय अकोटहुन अकोला-वाशिम-हिंगोली-नांदेडपर्यंत रेल्वे वाहतूक सुरू करण्याची मागणी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, विजय जितकर, रामदास काळे, लकी इंगळे, विजय शिंदे, मुकुंद कोरडे, मंगेश लोणकर, विजय जितकर यांच्यासह अमोल इंगळे, ठाकूर, गोयनका, वाशिम येथील डीआरयूसीसी सदस्य गुलाटी, जुगलकिशोर कोठारी, हिंगोली येथील राकेश भट, शोएब वासेसा, स. रियाज आदींनी यापूर्वीच केली आहे,
केंद्रात मंत्री असूनही रेल्वे सुरू नाही!
अकोट-अकोला दरम्यानचा संपूर्ण रेल्वेमार्ग अकोला लोकसभा मतदारसंघात येतो. संजय धोत्रे सध्या केंद्रात राज्यमंत्री आहेत. या रेल्वेमार्गाकरिता त्यांचे मोठे योगदान आहे. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या क्षेत्रात अकोट ते अकोलादरम्यान साधी रेल्वे सुरू करणे कठीण काम नाही. तसेच अकोट येथून रेल्वे सुरू करण्यासाठी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
चौकट...
प्रवासी रेल्वे एक महिन्यामध्ये सुरू करा : विजय जितकर
दोन वर्षांपासून अकोट-अकोला गेज बदलण्यात आले आहे. चार वर्षांपासून अकोट व त्याच्या आसपासच्या परिसरातील अनेक शेकडो गावे गाड्यांपासून वंचित राहिली आहेत, रोजगार व व्यवसाय ठप्प झाला आहे. आता गेज बदलण्यात आले आहे, त्यामुळे एससीआरने अकोलापर्यंत येणाऱ्या रेल्वेगाड्या अकोटपर्यंत कराव्यात तथा अकोट ते नांदेडला जाण्यासाठी नवीन प्रवासी अशी मागणीसाठी सेवानिवृत्त शिक्षक तथा समाजसेवक विजय जितकर यांनी पुढाकार घेतला आहे. रेल्वेगाडी चालविण्यास एससीआरने सुरुवात करावी. एका महिन्यात ही मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा विजय जितकर यांनी दिला.
चौकट.....
पावसाळ्यात पूर्णा नदीला पूर आल्यामुळे अकोला-अकोट रोड नेहमी बंद पडतो. शिवाय या रोडचे काम संथगतीने सुरू आहे. या रोडवर अपघाताची मालिका सुरू असून, अनेकांचे जीव जात आहेत. अशा जीवघेणा स्थितीत रेल्वेसेवा सुरू होणे अत्यावश्यक आहे.