विदर्भातील शेतक-यांच्या प्रक्रिया उद्योगास चालना!
By Admin | Updated: November 19, 2014 02:31 IST2014-11-19T02:02:51+5:302014-11-19T02:31:30+5:30
सीताफळाचा गर काढून बिया वेगळे करणारे यंत्र विकसित.
_ns.jpg)
विदर्भातील शेतक-यांच्या प्रक्रिया उद्योगास चालना!
राजरत्न सिरसाट / अकोला
विदर्भातील कृषिप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. याच मालिकेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने सीताफळाचा गर काढून बिया वेगळे करणारे अल्प किमतीचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण विदर्भातील शेतकरी, उद्योजकांना देण्यात येत आहे. दरम्यान, कापणीपश्चात तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागाने आतापर्यंत चार प्रक्रिया उद्योग उभे केले आहेत. डाळिंब या पिकासह प्रचंड मागणी असलेल्या सीताफळाचे क्षेत्र राज्यात ५६ हजार हेक्टरने वाढले आहे. कोरडवाहू क्षेत्रात उत्तम, शाश्वत आर्थिक स्रोत बनू शकणार्या या फळपिकाचे क्षेत्र आणखी वाढतच असून, या फळांवर प्रक्रिया करू न डबाबंद गर विक्रीसाठी तयार केला जात आहे. सीताफळाच्या या गराला भारतीय व आंतरराष्ट्रीय बाजारातही चांगली मागणी आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठाने गराची काढणी सुलभ करणारे अवघ्या साठ हजार रूपये किमतीचे यंत्र विकसित केले आहे. तद्वतच सीताफळाच्या नवीन जातीचे संशोधन करण्यावरही कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. सीताफळाचे आयुष्यमान दोन दिवसांचे असते. या फळाचा गर काही तासांत खराब होत असल्याने या यंत्राचे महत्त्व वाढले आहे. या अगोदर हे यंत्र तयार करण्याचे बरेच प्रयत्न झालेत. तथापि, त्या यंत्राची किंमत शेतकरी, उद्योजकांना परवडणारी नव्हती. शिवाय यंत्रामधून गर काढण्यासाठी विलंब होत असल्याने, त्याऐवजी मजूर लावूनच सीताफळाचा गर काढण्याचे काम आजमितीस केले जात आहे. आता कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या यंत्राने शेतकरी, उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. या यंत्राची किंमत साठ हजार रूपये असून, एका तासात ५0 ते ६0 किलो चांगल्या प्रतीचा गर काढण्याची क्षमता आहे. या यंत्राची पाहणी करण्यासाठी राज्यातील शेतकरी, बडे उद्योजक येथे येत आहेत. शेतकर्यांचे प्रक्रिया उद्योग उभे राहावेत, याकरिता या कृषी विद्यापीठाने विदर्भातील शेतकर्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे.