अघोषित भारनियमनाने शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: August 21, 2014 19:38 IST2014-08-21T19:33:21+5:302014-08-21T19:38:55+5:30
बोरगाव वैराळे परिसरात कालपासून अघोषित भारनियमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत.

अघोषित भारनियमनाने शेतकरी त्रस्त
बोरगाव वैराळे : बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे परिसरात कालपासून अघोषित भारनियमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत. सतत १० तासापासून वीज नसल्याने गावकर्यांच्या नाकीनऊ आले आहेत. या परिसरातील बोरगाव वैराळे, सोनाळा, दुधाळा, हातरू ण, मंडाळा, लोणाग्रा, खांबोरा या भागात केंव्हाही वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज पुन्हा कधी येईल, याची काहीच श्वाश्वती नसल्याने गावकर्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पंधरा दिवसांपासून श्रावणसरी या भागात बसरलेल्याच नाहीत. त्यामुळे कोरडवाहू शेतकरी आधीच हतबल झाले आहेत. हातरू ण परिसरातील ओलिताचे साधन असलेले शेतकरी पिके जगविण्यासाठी रात्रीचा दिवस करीत असले तरी विविध कारणे समोर ठेवून महावितरणकडून अघोषित भारनियमन केले जात आहे. त्यामुळे पाणी असतानाही हतबल होण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. ब्रेकडाऊन, इमर्जन्सी, जम्परफाल्ट आदी शब्दाचा वापर करून लाईनमन ते अभियंता शेतकर्यांना समजावत आहे. मात्र रोज हे शब्द ऐकून शेतकरी आता त्रस्त झाला आहे. कर्मचारी कमी आणि रोहित्र जास्त अशी अवस्था असल्याने आता भ्रमणध्वनी उचलण्यासही टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे.
भारनियमनाच्या वेळेव्यतिरिक्त हे भारनियमन सुरू राहत असल्याने शेतकर्यांच्या संतापाच्या उद्रेकाला वीज वितरण कंपनीला समोरे जावे लागत आहे. वीज खंडित झाल्यानंतर पिठगिरण्या बंद पडतात. त्यामुळे बाहेरगावावरू न दळण दळून आणावे लागते. ग्रामीण भागातील भारनियमन कमी करावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत असली तरी वीज वितरण अधिकारी याला काहीच प्रतिसाद देत नसल्याने गावकर्यांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)