कारवाईसाठी टोलवाटोलवी!
By Admin | Updated: February 20, 2016 02:34 IST2016-02-20T02:34:09+5:302016-02-20T02:34:09+5:30
केळीचे बियाणे वांझोटे निघाल्याचे प्रकरण; प्रशासनाकडून खच्चीकरणाचा शेतक-यांचा आरोप.

कारवाईसाठी टोलवाटोलवी!
आकोट: केळीचे निकृष्ट व बोगस बियाणे देऊन फसवणूक झाल्याची तक्रार करूनही कृषी व पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करीत नसून, मानसिक खच्चीकरण करीत असल्याचा आरोप शेतकर्यांची केला आहे. शुक्रवारी ग्रामीणच्या ठाणेदारांनी शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. फसवणूक झाल्याची तक्रार आंबोडा येथील १२ शेतकर्यांनी ८ फेब्रुवारी रोजी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली होती. पणज येथील रमेश आकोटकर यांच्यासह दोघांनी फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही अद्याप पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तक्रारीच्या अनुषंगाने १0 फेब्रुवारी रोजी केळी उत्पादक शेतकर्यांना आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बोलाविण्यात आले. यावेळी ठाणेदार किशोर शेळके व तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे यांनी शेतकर्यांसोबत चर्चा केली. यावेळी शेतकरी समक्ष उपविभागीय कृषी अधिकारी यांना या प्रकरणाचा पीक पाहणी व बोगस बियाण्याबाबतचा तज्ज्ञ समितीचा अहवाल मागविण्याचे पत्र देण्यात आले. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडणार असल्याचे सांगण्यात आले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतरही पोलीस कारवाई का करीत नाहीत, असा सवाल शेतकर्यांमधून उपस्थित करण्यात येत आहे. कारवाईसाठी वरिष्ठ अधिकार्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.