अकोला : गारपिटीचे तांडव थांबेना, बार्शीटाकळी, पातूरला पुन्हा झोडपले
By राजेश शेगोकार | Published: April 27, 2023 05:19 PM2023-04-27T17:19:27+5:302023-04-27T17:19:54+5:30
अकोला : गुरूवारी सायंकाळी ५:३० वाजतापासून अचानक अवकाळी पावसाची वादळी वाऱ्यासह ‘एन्ट्री’ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची तारांबळ उडाली होती. ...
![The hail storm did not stop, the rains hit Patur again | अकोला : गारपिटीचे तांडव थांबेना, बार्शीटाकळी, पातूरला पुन्हा झोडपले The hail storm did not stop, the rains hit Patur again | अकोला : गारपिटीचे तांडव थांबेना, बार्शीटाकळी, पातूरला पुन्हा झोडपले](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/rajesh-shegokar-34556_2023041009803.jpg)
अकोला : गारपिटीचे तांडव थांबेना, बार्शीटाकळी, पातूरला पुन्हा झोडपले
अकोला : गुरूवारी सायंकाळी ५:३० वाजतापासून अचानक अवकाळी पावसाची वादळी वाऱ्यासह ‘एन्ट्री’ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची तारांबळ उडाली होती. सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा बार्शीटाकळी व पातूर तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसला. ही गार लिंबा एवढी हाेती या गारांसह वादळी वाऱ्याने लिंबू व कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसाचे दुष्टचक्र थांबता थाबेनासे झाले आहे. मंगळवारी कुठे रिमझिम, कुठे रिपरिप, तर कुठे मुसळधार पाऊस कोसळला. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाने दाणादाण उडविली. त्यानंतर पुन्हा बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाने धडक दिल्याने कांदा पिकाला फटका बसला आहे. पातूर तालुक्यातील बाभूळगाव, भंडारज, कापसी, दादुलगाव, तांदळी परिसरात वादळी वारा व हलका पाऊस बरसला. तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील वरखेड, देवदरी धाबा परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला.
गुरूवारी पुन्हा गारपीटीने झाेडपले, गारांचा वर्षाव, आरोग्य धोक्यात
पातूर, बार्शीटाकळी तालुक्यात गारांचा वर्षाव झाला. अवकाळी पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला होता. वातावरणात बदल झाल्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवसभर उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना वातावरण थंड झाल्याने दिलासा मिळाला.
लिंबू मातीमोल, कांदा सडला
जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, शेतकरी वैतागला आहे. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतात पाणीच पाणी साचले असून, कांद्याचे पीक सडल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून मदत देण्याची मागणी होत आहे. तसेच लिंबू पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.