मातीच्या मगदुरानुसार आता पिकांचे नियोजन!
By Admin | Updated: November 23, 2014 23:54 IST2014-11-23T23:54:25+5:302014-11-23T23:54:25+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा माती परीक्षण जनजागृतीसाठी विदर्भात शेती शाळा घेण्यावर भर.
मातीच्या मगदुरानुसार आता पिकांचे नियोजन!
अकोला : बदलते हवामान, पावसाची अनियमितता बघता, यापुढे मातीच्या मगदुरानुसारच शेती, पिकांचे नियोजन करण्याची गरज असून, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने माती परीक्षण जनजागृतीसाठी विदर्भात शेती शाळा घेण्यावर भर दिला आहे. कृषी विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाद्वारे प्रामुख्याने कापूस व सोयाबीन या पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनबाबत विदर्भातील शेतांवर प्रयोग घेणे सुरू केले आहे. आंतरराष्ट्रीय पीक पोषण संस्थेद्वारे (दक्षिण आशिया कार्यक्रम) विदर्भातील कापूस व सोयाबीन पिकविणार्या शेतकर्यांच्या शेतांवर अभ्यास करण्यात येत आहे. सध्या अकोला जिल्हय़ातील महागाव व मिर्झापूर गावातील कापूस व सोयाबीन पिकांची निवड करण्यात आली असून, या पिकांना स्थानिक गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच जमिनीची अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता इत्यादीविषयी शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कापूस हे विदर्भातील प्रमुख नगदी पीक आहे; परंतु अलिकडे सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढले आहे. मुख्यत्वे पश्चिम विदर्भातील कृषी अर्थव्यवस्थाच या दोन पिकांच्या भोवती आहे. त्यामुळे इतर पिकांसह या दोन प्रमुख पिकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कोणतीही पिके घ्यायची असतील, तर जमिनीचे आरोग्य बघणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संतुलित खताचा वापर, सेंद्रिय खताचे महत्त्व आणि खतांचे पीक पोषणातील महत्त्व याकडे शेतकर्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. शेतीची पोत बिघडली असून, भरमसाठ खते, रसायनाचा होणारा वापर त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे कापसावर कधी लाल्या, तर कधी ुदहीया असे अनेक रोगांचे आक्रमण वाढले आहे. त्याचा फटका उत्पादनाला तर बसतोच शिवाय, प्रतसुद्धा बिघडते. यासाठी येत्या खरीप हंगामापूर्वी शेतकर्यांचे प्रबोधन करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पीक पोषण संस्थेद्वारे विदर्भातील शेती, माती आदीवर भर देण्यात येत असून, कृषी विद्यापीठाच्यावतीने शेतकर्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेती आणि माती हे पीक उत्पादनाचे प्रमुख घटक असले, तरी स्थानिक गरजेनुसार या शेतीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच जमिनीची अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता योग्य असणे गरजेचे आहे. यासाठीच शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे गुडगाव येथील आंतरराष्ट्रीय पीक पोषण संस्थचे अध्यक्ष डॉ. कौशिक मजुमदार यांनी सांगीतले.