विजयाची मदार स्थानिक नेत्यांवरच!
By Admin | Updated: October 6, 2014 01:40 IST2014-10-06T01:40:00+5:302014-10-06T01:40:00+5:30
अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात मोठय़ा नेत्यांची पाठ: उमेदवारांची दमछाक.

विजयाची मदार स्थानिक नेत्यांवरच!
अजय डांगे / अकोला
भाजप-शिवसेना महायुती आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचा स्वतंत्र लढा, युती तुटल्याने चारही पक्षांमध्ये निर्माण झालेली कटूता आणि प्रमुख राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांनी आतापर्यंंत फिरवलेली पाठ, यामुळे विजयाची मदार तुर्तास तरी स्थानिक नेत्यांवरच अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभेच्या जागा वाटपावरून आघाडी आणि महायुती दुभंगली. त्यामुळे शिवसेना-भाजपचे उमेदवार राज्यभर एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. या चारही पक्षांचे राज्यभरातील नेते ऐकमेकांवर टीका करीत असून, या टीकेचे पडसाद जिल्हास्तरावरही उमटू लागले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पंचरंगी लढत होणार आहे. प्रचाराला एकच आठवडा शिल्लक असला तरी, तूर्तास जिल्ह्यात एकही पक्ष वातावरणनिर्मिती करू शकलेला नाही. शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक ने त्यांवरच वातावरणनिर्मिती करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्या तरी अकोल्यात सभा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खासदार, आजी-माजी आमदार आणि इतर नेत्यांचा विजयश्री खेचून आणण्यासाठी कस लागणार आहे. कॉँग्रेसमध्येही अद्याप मोठय़ा सभांच्या दृष्टीने नियोजन झालेले नाही. अशातच कॉँग्रेसमधील नगरसेवक आणि इतर पदाधिकारी विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार करीत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार हे शुक्रवारी अकोल्यात मुक्कामी थांबले, मात्र त्यांनी सभा घेतली नाही. काही प्रमाणात अशीच स्थिती भारिप-बमसंमध्येही आहे.