काटेपूर्णा, मात्र तहानलेलेच!
By Admin | Updated: September 18, 2014 02:41 IST2014-09-18T02:21:38+5:302014-09-18T02:41:30+5:30
व-हाडातील दहा धरणांमधून विसर्ग सुरू; काटेपुर्णातील जलसाठा केवळ ३९ टक्के!

काटेपूर्णा, मात्र तहानलेलेच!
अकोला : पश्चिम विदर्भातील धरणांच्या जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली असून, दहा धरणांमधून अद्यापही विसर्ग सुरू आहे; परंतु अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा धरणाचा जलसाठा ३९ टक्कय़ावरच स्थिरावला आहे. यामुळे अकोलेकरांपुढे पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला विदर्भातील काही जिल्हय़ात चांगला पाऊस झाला, पण अकोला व वाशिम जिल्हय़ाला हवा तसा पाऊस झाला नसल्याने या जिल्हय़ातील धरणांच्या जलपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. पातूर तालुक्यातील निगरुणा हे छोटे धरण मात्र शंभर टक्के भरले असून, या धरणातून २.५ सेंमीचा साडवा वाहत आहे. याचा विसर्ग प्रतिसेंकद २.४ दलघमी प्रतितास एवढा आहे. मोर्णा धरणात २४.४९ दलघमी म्हणजेच ५९ टक्के जलसाठा आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या धरणामध्ये २४ टक्के जलसाठा संचयीत झाला असून, बाश्रीटाकळी तालुक्यातील दगड पारवा या धरणाची पातळी शून्य आहे. आकोट तालुक्यातील पोपटखेड या लघू पाटबंधार्याचे दोन वक्रद्वार १ सेंमीने उघडण्यात आले आहेत. यामधून प्रतिसेकंद २.६७ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर तेल्हारा तालुक्यातील वाण या प्रकल्पाचे दोन वक्रद्वार १0 सेंमीने उघडण्यात आले आहेत. यामधून प्रतिसेकंद १६.७२ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठय़ाची स्थिती सुधारली असून, मस, कोराडी व पलढग ही तीन धरणं शंभर टक्के भरली आहेत. यातील मस धरणातून ५ सेंमी साडवा वाहत असून, याचा पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद २ दलघमी आहे. पलढगमधून ५ सेंमी वरू न पाणी वाहत असून, हा प्रतिसेंकद १३ दलघमी एवढा विसर्ग सुरू आहे. या जिल्हय़ातील नळगंगा या धरणात ५७ तर ज्ञानगंगा या धरणाचा जलसाठा ७३ टक्के आहे. यवतमाळ जिल्हय़ातील सहा धरणं ओव्हर फ्लो आहेत. यातील सायखेडा या धरणातून ६ सेंमीवरू न पाणी साडवा सुरू असून, प्रतिसेंकद ११ दलघमी विसर्ग सुरू आहे. गोकी धरणातूनही ६ सेंमी पाणी वाहत आहे. हा विसर्ग प्रतिसेकंद ६ दलघमी आहे. वाघाडी या धरणातून ६ सेंमीने पाणी वाहत आहे. याचा विसर्ग प्रतिसेकंद ३ दलघमी एवढा आहे तर बोरगाव या धरणातून १ सेंमी वरू न पाणी वाहत आहे. याचा विसर्ग 0.२४ दलघमी आहे.