‘प्लास्टिक मुक्ती’साठी सरसावले शासन; गावागावांतून करणार कचऱ्याची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 15:46 IST2019-09-15T15:45:56+5:302019-09-15T15:46:04+5:30
खुल्या जागा, नाल्या, रस्त्यांवर पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर प्लास्टिकमुक्त केला जाणार आहे.

‘प्लास्टिक मुक्ती’साठी सरसावले शासन; गावागावांतून करणार कचऱ्याची उचल
- सदानंद सिरसाट
अकोला: जमिनीवर कुठेही पडून असलेला प्लास्टिक कचरा गोळा करून त्याचा रस्ता कामात वापर किंवा नष्ट करण्यासाठी शासनस्तरावर जोरकस प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी (महापालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत) प्लास्टिक गोळा करावे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्याची विल्हेवाट लावली जाईल, असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्तांना शुक्रवारी दिले.
प्लास्टिक कचºयामुळे व मायक्रो प्लास्टिकमुळे सागरी जीव, नदी-नाल्यातील जलचर व जैवविविधतेवर परिणाम होतो. शेती, वने या ठिकाणी प्लास्टिकमुळे उपयुक्त नैसर्गिक घटक व साधन संपत्तीचा ºहास होतो. त्याशिवाय, मानवी आरोग्यावरही भयंकर परिणाम होतो. त्यासाठी प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी गंभीरपणे करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी शासनाने २३ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत प्लास्टिक बंदीसाठी कारवाईची जबाबदारी महापालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत आणि प्रदूषण नियंत्रण मंडळावर सोपवली. प्लास्टिक निर्मिती रोखण्याच्या मुद्यावर कारवाई करणेही गरजेचे आहे. त्याच वेळी सर्वत्र जमा झालेल्या प्लास्टिक कचºयाची विल्हेवाट लावणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यभरात एकाच वेळी प्लास्टिक कचरा गोळा करण्याची मोहीम श्रमदानातून राबवण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्तांनी तातडीने ती सुरू करावी, असेही बजावण्यात आले.
- कचºयाची उचल प्रदूषण मंडळ करणार
प्रत्येक शहर, ग्रामपंचायत हद्दीतील खुल्या जागा, नाल्या, रस्त्यांवर पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर प्लास्टिकमुक्त केला जाणार आहे. गोळा केलेला प्लास्टिक कचरा उचलण्याची तसेच विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. मंडळाकडे असलेल्या नियोजनानुसार कचºयाचा वापर किंवा नष्ट केला जाणार आहे.
- प्रत्येक जिल्हा परिषद गटातून ४ टन कचरा
अकोला जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटातून १ ट्रक (४ टन) प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी शनिवारी सर्व जिल्हा परिषद, माध्यमिक, खासगी शाळांच्या परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. उद्या रविवारी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, संस्था, ग्रामस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.