भाजीपाल्याला महागाईचा तडका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 16:48 IST2020-07-22T16:48:14+5:302020-07-22T16:48:28+5:30

लॉकडाऊनमुळे आधीच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने दर ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत.

Inflation hits vegetables |   भाजीपाल्याला महागाईचा तडका!

  भाजीपाल्याला महागाईचा तडका!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : तीन दिवसांच्या लॉकडाऊननंतर मंगळवारी बाजारपेठ खुली होताच भाजीबाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. अनेक भाज्यांची कमी झालेली आवक अन् ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता भाजीपाल्याचे दर महागले होते. दरवाढीच्या या तडक्यामुळे ग्राहकांना मात्र भुर्दंड बसला
जिल्ह्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यावर घरपोच भाजीपाला ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय झाली होती; मात्र तरीही बाजारातील गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे मनपाने भाजी बाजार बंद करून फिरत्या विक्रेत्यांना परवानगी दिली होती. त्यावेळीही भाजीपाल्याचे भाव अटोक्यात होते; मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजीपाल्याच्या भावात आलेली तेजी आजतागायत कायम आहे. यंदा पावसानेही सुरुवातीपासूनच चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांसह भाजीपाल्याचीही लागवड केली. उत्पादन चांगले आल्याने मे आणि जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे दर स्थिर होते. गेल्या तीन आठवड्यांपासून सततचे ढगाळ हवामान आणि वारंवार होणाºया पावसामुळे भाजीपाल्याची वाढ खुंटून पिवळा पडला. तसेच मोठ्या शहरांमधील लॉकडाऊनमुळे आधीच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने दर ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत.


लॉकडाऊननंतर मंगळवारी सकाळी भाजी खरेदीसाठी गेलो असता अवघ्या तीन दिवसातच अनेक भाज्यांचे भाव वाढल्याचे दिसून आले. टोमॅटो, बटाटे, पालक, शेवगा यांचे भाव वाढलेले दिसले. टोमॅटोचे भाव वाढूनही क्वालिटी घसरल्याचे दिसून आहे. - रवींद्र भवाने, ग्राहक, उमरी अकोला


कोरोनामुळे बाहेरून येणाºया अनेक भाज्यांची आवक कमी झाली. अकोल्यातील लॉकडाऊनमुळे साठवणूक केलेला माल संपला. नवीन माल आला नाही. त्याचाही परिणाम भावावर झाला आहे.
- रणजित सिकची, भाजी विक्रेता

Web Title: Inflation hits vegetables