तीन जणांची टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:20 IST2021-05-27T04:20:13+5:302021-05-27T04:20:13+5:30
आरोपी बुलडाणा व जळगाव जिल्ह्यातील, पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचा आदेश अकोला : जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या तीन जणांच्या ...

तीन जणांची टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार
आरोपी बुलडाणा व जळगाव जिल्ह्यातील,
पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचा आदेश
अकोला : जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे ३१ पेक्षा अधिक टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे. या टोळीतील २ आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील तर एक आरोपी जळगाव खान्देश जिल्ह्यातील रहिवासी आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील तेलीपुरा येथील रहिवासी सय्यद रोशन सय्यद कदीर वय ३२ वर्ष व सय्यद आझाद सय्यद कदीर वय ३५ वर्ष तसेच जळगाव खान्देश जिल्ह्यातील रोहित पंडित निहाळे वय २१ वर्ष या तिघांनी रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळीने गुन्हे केल्याची माहिती तपासात समोर आली. यासोबतच जिल्ह्याच्या विविध भागात टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून तिन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी या तिघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून रामदास पेठ पोलिसांनी या तीन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. रामदास पेठ पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात या तिघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली ; मात्र तीनही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने या तिन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हा आदेश बुधवारी दिला असून टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे. या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व रामदास पेठ पोलिसांनी प्रयत्न केले.