वनक्षेत्रात फायर लाईनची कामे कुचकामी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST2021-04-06T04:18:12+5:302021-04-06T04:18:12+5:30

अमोल सोनोने पांढुर्णा : जंगलाला आगी लागू नये, लागलीच तर नुकसान होऊ नये म्हणून दरवर्षी पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रात ...

Fire line work ineffective in forest area! | वनक्षेत्रात फायर लाईनची कामे कुचकामी!

वनक्षेत्रात फायर लाईनची कामे कुचकामी!

अमोल सोनोने

पांढुर्णा : जंगलाला आगी लागू नये, लागलीच तर नुकसान होऊ नये म्हणून दरवर्षी पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रात वन व वन्यजीव विभागात फायर लाईनची कामे केली जातात. त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. त्यानंतर फायर वॉचर व अंगारीवर लाखो रुपये खर्ची पडल्याचे दाखविले जाते. पण, यावर्षी ही फायर लाईनची कामे कुचकामी ठरली. आलेगाव वनपरिक्षेत्रात दररोज आगी लागल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वनसंपदेचे नुकसान होत आहे. त्यामुळे लागलेल्या आगीच्या घटनांची, प्रत्यक्ष जळालेल्या जंगल क्षेत्राची, झालेल्या नुकसानाची चौकशीची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

पातूर तालुक्यातील सर्व बीटमध्ये दररोज आगीच्या घटना घडत आहेत. असे असताना कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची ॲलर्जी असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगलांना आग लागण्याच्या घटना घडतात. याबाबत वनविभागाला माहिती असल्याने डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत जाळरेषेच्या माध्यमातून वनक्षेत्राचे सभोवताल तसेच वनातून जाणाऱ्या रस्त्याच्या आजूबाजूचे गवत काढले जाते. पण, वनाधिकारी व कर्मचारी यांच्याकडून प्रामाणिकपणे पूर्ण जाळरेषेचे काम केले जात नसल्यामुळे वनांना आग लागते, असे वनक्षेत्रालगत गावांतील नागरिकांचे म्हणणे आहे. आलेगाव वन परिक्षेत्रात वन व वन्यजीव विभागामार्फत फायर लाईनची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत; मात्र आगीच्या घटना वाढत असल्याने ही कामे कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. (फोटो)

-------------------------------------------------------

रस्ता अपघातात वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात

उन्हाळा लागल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असते. त्यामुळे रस्ता ओलांडताना वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. अपघात टाळण्यासाठी जंगलाला जाळी लावण्यात यावी, अशी मागणी परिसरातील लोक करत आहेत

------------------------------------------ - - - - - - - - - - - - -

या सर्व बीटमध्ये दररोज आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

पांढुर्णा २ पिंपळडोळी १ पिंपळडोळी २ सोनुना १ सोनुना २ भोरद शेकापूर १ शेकापूर २ पाचरण

---------------------- ----------- ----------------------

जंगलामध्ये परिसरातील लोक मोह वेचण्यासाठी झाडाखाली पालापाचोळा जाळून टाकत आहेत. त्यामुळे आगी लागण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर गावातील लोकांनी आम्हाला जंगल जाळणाऱ्यांची माहिती द्यावी. आम्ही कारवााई करू.

-सतीश नालींदे, वन वनपरिक्षेत्र अधिकारी, आलेगाव.

Web Title: Fire line work ineffective in forest area!