सोयाबीनपाठोपाठ कपाशीचे पीकही हातचे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 10:53 IST2020-10-30T10:52:58+5:302020-10-30T10:53:06+5:30

Cotton Crop, Akola News बोंडे काळवंडल्याने भाव कमी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

Fear of losing cotton crop along with soybean | सोयाबीनपाठोपाठ कपाशीचे पीकही हातचे जाण्याची भीती

सोयाबीनपाठोपाठ कपाशीचे पीकही हातचे जाण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातून उडीद, मूग पिकाबरोबर सोयाबीनचे पीकही गेले. आता कपाशीबाबतही तीच स्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. आधी कपाशीची पानगळ झाली, नंतर अतिवृष्टीमुळे बोंडे सडली आणि आता कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाले आहे. वारंवार कीटकनाशक फवारूनही बोंडअळी नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांनी हात टेकले आहे. तसेच बोंडे काळवंडल्याने भाव कमी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. जिरायती, बागायती व फळबागांना त्याचा मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची झळ बसली आहे. शासनाकडून अद्यापही नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे. गेल्या चार महिन्यात सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील ५१,८५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाने उडीद, मूग, सोयाबीन हे पीक धुऊन नेले. त्यापाठोपाठ आता कपाशीचे पीकही धोका देण्याची चिन्हे दिसू लागली आहे. आधी पानगळ झाली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे कपाशीची बोंडे सडली. आता या कपाशीवर बोंडअळ्यांनी हल्ला केला आहे. या कच्च्या असलेल्या बोंडातच किती तरी अळ्या दिसून येत आहेत. कपाशीचे पीकही हातचे गेल्यास शेतकरी आणखी आर्थिक गर्तेत लोटला जाणार आहे. शासनाने या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे.

तुरीचे पीकही धोक्यात

पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे व ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीकही धोक्यात सापडले आहे. सध्या शेतकरी फवारणीच्या कामात व्यस्त आहे. महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Fear of losing cotton crop along with soybean