विदर्भातील शेतकऱ्यांनी तिफण काढली!
By Admin | Updated: June 13, 2017 01:43 IST2017-06-13T01:43:59+5:302017-06-13T01:43:59+5:30
पेरणीची तयारी, अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सुरुवात

विदर्भातील शेतकऱ्यांनी तिफण काढली!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मागील आठवड्यापासून विदर्भात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसत असून,अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठीची तिफण काढली आहे. अकोला जिल्ह्यात तर तुरळक ठिकाणी शेतक ऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे.
विदर्भात जवळपास ४९ लाख हेक्टरच्यावर खरीप हंगामाचे क्षेत्र असून,यात पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरचा समावेश आहे. यावर्षी पावसाचे चित्र समाधानकारक असल्याचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविले आहे. सार्वत्रिक मोसमी पावसाने राज्यात प्रवेश केला आहे. सार्वत्रिक पावसाच्या अगोदरच अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. याच पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांची बियाणे बाजारात काही प्रमाणात लगबग वाढली आहे. आतापर्यंत एकूण उपलब्ध बियाण्यांपैकी २५ टक्केच्यावर बियाण्यांची शेतकऱ्यांनी उचल केले आहे. काही शेतकऱ्यांना सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे.
पश्चिम विदर्भात यावर्षी ३२ लाख हेक्टरपैकी अर्ध्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाणार आहे; परंतु गतवर्षीच्या तुलनेत ते १० टक्के कमी असेल, असे कृषी विभागाने नियोजन केले आहे. कापसाचे क्षेत्र पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता. यावर्षी बीटी कापसासोबतच देशी कापसाचा पेरा वाढणार असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापूस तज्ज्ञांचे मत आहे. मागीलवर्षी कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी झाले असून, दरही चांगले होते. कापूस क्षेत्र वाढण्यामागे हेदेखील एक प्रमुख कारण सांगितले जात आहे. तुरीचे क्षेत्र मात्र कमी होेण्याची शक्यता कृषी विभाग वर्तवित आहे. मूग, उडिदाचे क्षेत्र वाढणार आहे. अकोला जिल्ह्यात पातूर, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर व अकोला तालुक्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली आहे. अकोला, अकोट व तेल्हारा तालुक्यातील तुरळक ठिकाणी शेतकऱ्यांनी मूग, उडीद पिकांची पेरणी सुरू केली आहे.
यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसे संकेतही दिसत आहेत. अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावल्याने काही तुरळक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरू वात केली आहे. यावर्षी बियाणे, खतेही मुबलक आहेत.
-एस.आर. सरदार, संयुक्त कृषी संचालक,कृषी विभाग,अमरावती.