वाशिम जिल्ह्यातील चारही वीज अटकाव यंत्रांना ‘उतरती कळा’!
By Admin | Updated: July 12, 2016 00:35 IST2016-07-12T00:35:30+5:302016-07-12T00:35:30+5:30
प्रशासकीय उदासीनता ; वीज पडून तीन वर्षांत १0 जणांचा मृत्यू.

वाशिम जिल्ह्यातील चारही वीज अटकाव यंत्रांना ‘उतरती कळा’!
सुनील काकडे / वाशिम
आकाशातून जमिनीकडे आकर्षित होणार्या विजेने गत तीन वर्षांंत जिल्ह्यातील तब्बल १0 लोकांचा बळी घेतला. याशिवाय शेकडो जनावरेही यामुळे जिवाला मुकली आहेत. असे असताना जिल्ह्यात आजपर्यंत केवळ ४ ठिकाणी वीज अटकाव यंत्र उभी झाली असून, त्यांचीही आजरोजी दुरवस्था झालेली आहे.
साधारणत: मे महिन्याच्या अखेरीस, जून महिन्याच्या प्रारंभी आणि ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस पडण्याचे प्रमाण अधिक असते. या कालावधीतच विजांचा कडकडाट होऊन प्राणहानी होण्याची शक्यता उद्भवते. वाशिम जिल्ह्यात सन २0१३-१४ मध्ये एका इसमाचा वीज पडून मृत्यू झाला, २0१४-१५ मध्ये ७ जण गंभीररीत्या जखमी झाले, २0१५-१६ मध्ये वीज पडून ७ जणांना प्राणाला मुकावे लागले; तर एप्रिल २0१६ पासून आजपर्यंंत दोघांचा या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला.
दरम्यान, आकाशातून चकाकत येणारी वीज नेमकी कुठे पडेल, हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी ठिकठिकाणी वीज अटकाव यंत्र (लायटिंग र्ओस्टर) उभारणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. वाशिम जिल्ह्यात आजमितीस केवळ चार वीज अटकाव यंत्र असून, ती वाशिम नगर परिषद, वाराजहाँगीर (ता. वाशिम), भुलोडा (ता. कारंजा) आणि डव्हा (ता. मालेगाव) याठिकाणी आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांंपासून या यंत्रांच्या देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष पुरविले गेले नसल्याने त्यांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून अस्तित्वातील वीज अटकाव यंत्रांची दुरुस्ती करून नव्याने आणखी यंत्र बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
विजेपासून करा स्वत:चे रक्षण!
वीज पडून सन २0१३ पासून आजपर्यंंत १0 जणांना जीव गमवावा लागला. तथापि, विजांचा कडकडाट सुरू असताना प्रामुख्याने मोबाइलचा वापर टाळणे आवश्यक आहे. पाण्यात असाल तर तत्काळ बाहेर यावे, झाडाखाली उभे राहू नये, अशावेळी विद्युत उपकरणे बंद ठेवणेच अधिक फायदेशीर असून, एकाचवेळी जास्त व्यक्ती एकत्र उभे न राहता दोन व्यक्तींमध्ये किमान १५ फूट अंतर ठेवावे, आदी उपाय प्रामुख्याने केल्यास विजेपासून स्वत:चे रक्षण करणे शक्य होईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बाळासाहेब बोराडे यांनी दिली.