आचारसंहितेची विकासमांना नाही आडकाठी
By Admin | Updated: May 24, 2014 20:10 IST2014-05-23T23:10:49+5:302014-05-24T20:10:48+5:30
शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त विकासकामांना आचारसंहितेची आडकाठी राहणार नसल्याचे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले

आचारसंहितेची विकासमांना नाही आडकाठी
अकोला : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेच्या काळात शिक्षक, शैक्षणिक संस्थांबाबत कोणताही नवीन निर्णय किंवा योजना जाहीर करता येणार नाहीत. शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या विकासकामांना आचारसंहितेची कोणतीही आडकाठी राहणार नसल्याचे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता गेल्या ५ मार्चपासून लागू करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल १६ मे रोजी जाहीर झाल्यानंतर १८ मे रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली. लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात गेल्या ५ मार्च ते १८ मे दरम्यान, नवीन विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देणे किंवा नवीन योजनेसंदर्भात निर्णय घेण्याची प्रक्रिया बंद झाल्याने, जिल्ह्यात विविध विकासकामे ठप्प झाली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच गत १९ मे पासून अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली. या निवडणुकीसाठी येत्या २० जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी २४ जून रोजी होणार असून, या निवडणुकीची प्रक्रिया २८ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. म्हणजेच तोपर्यंत या निवडणुकीची आचारसंहिता राहणार आहे.
**आचारसंहितेचा असाही बागुलबुवा!
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. लोकसभा निवडणूक आचारसंहिताप्रमाणेच शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहिता काळातही कोणत्याही प्रकारची विकासकामे करता येणार नाहीत, त्यासंदर्भात निर्णय घेता येणार नाही, नवीन विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देता येणार नाही, असे प्रशासनातील सर्वच विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेचा जिल्ह्यात विविध विभागाकडून बागुलबुवा करण्यात येत असल्याचे चित्र आहे.