अकोटात आठवडी बाजार बंदचा निर्धार
By Admin | Updated: June 3, 2017 01:37 IST2017-06-03T01:37:34+5:302017-06-03T01:37:34+5:30
शेतकरी संघटनेची अडते, व्यापाऱ्यांसोबत बैठक

अकोटात आठवडी बाजार बंदचा निर्धार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: आपल्या विविध मागण्यांकरिता शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपात शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन रविवारी अकोट येथे भरणाऱ्या आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटना व भाजीपाला असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आला.
अकोट येथील भाजीपाला मार्केटमध्ये शेतकरी संघटनेची २ जून रोजी बैठक पार पडली. यावेळी शेतकरी संपाला भाजीपाला मार्केट अडते व व्यापारी यांनी सहकार्य करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष विनोद अस्वार यांनी रविवार ४ जून रोजी सर्व अडत दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे आवाहन केले. तर काहींनी आतापासूनच आपल्या अडतवर बंदचे फलक लावले. या बैठकीला शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख, तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार, अकोट तालुका प्रमुख प्रफुल्ल बदरखे, युवा आघाडी प्रमुख विक्रांत बोंद्रे, गजानन बोरोकार, संदीप भुस्कट, दत्ता पाटील, विलास गावंडे, संतोष अवारे, ज्ञानेश्वर जायले, श्रीकांत भोरखडे, रोशन इंगळे, अक्षय उकळकर, भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष विनोद अस्वार, रामदास अवंडकार, राजू झाडे, मोहन शेगोकार, सुभाष दामधर, प्रवीण अंबडकर, मोहन धर्मे, अनंत रंदे, कादिर भाई, पंढरीनाथ सिरस्कार, आसिफ भाई आदी अडते व व्यापारी उपस्थित होते.
बाळापूरातही भाव वाढले!
बाळापूर शहरात शेतकऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणत नसल्याने संपाच्या दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी कृत्रिम भाववाढ केली. शेतकरी संपामुळे जनजीवनाला हळूहळू फटका बसत आहे. व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांजवळील खरेदी करून स्टॉक केलेला माल पुरेल. स्टॉक संपल्यानंतर मात्र भाववाढीसोबत भाजीपाला मिळेनासा होणार आहे. आज बाजारपेठेत अल्पशा भाजीपाल्यावर व्यापारी व्यापार करीत होते.