कोरोना विषाणूने नातेसंबंधही तोडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:18 AM2021-05-08T04:18:26+5:302021-05-08T04:18:26+5:30
बाळापूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून, कोविड-१९ मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
बाळापूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून, कोविड-१९ मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे माणुसकीचे आणि रक्ताचे नातेही दुरावले आहे. भाऊ भावाला, बहीण भावाला आणि मुलगा बापाला आणि वडील काकाला, मित्र मित्राला विसरला असून, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घराजवळून कोणी फिरकतदेखील नसल्याचे चित्र आहे.
कोरोनाने गरीब-श्रीमंत भेद तोडला असून, सर्व एका शृंखलेत गुंफले आहे. माणुसकी विसरून स्वार्थ बघायला लागला, तर स्वतःचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आहे. दरवाजबंद प्रणाली सुरू झाल्याने कुठे गेले माणुसकीचे बंधन, असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे. सर्वसामान्य जनता भाकरीच्या शोधात वणवण भटकंती करीत असून, स्वत:ला उच्चभ्रू समजणारे भावाला भाऊ , बहीण, काका, बाप, आई हे सर्व नाते विसरून दरवाजाबंद झाले आहेत. जन्म देणारी आई गेली तरी मुलांनी व्हॉट्सॲपवर व्हिडिओ चॅटिंग करून अंत्यदर्शन घेतले. ही भारतीय संस्कृती विज्ञान आणि कलियुगात पाहावयास मिळत आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यावर मुलांनीसुद्धा अंत्यसंस्काराला पाठ देऊन सफाई कामगारांकडून तर कुठे शेजारच्या परधर्मीयांकडून अंत्यसंस्कार करवून घेतल्याची उदाहरणे आहेत. आजारी रुग्णाला उपचारार्थ नेण्यासाठी आप्तस्वकीय पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
--------------------------------------------------
उन्हाळा सुरू झाल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
बार्शीटाकळी : बार्शीटाकळी ते मानोरा मार्गावर घनदाट जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या जिवाला धोका होऊ नये, यासाठी वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, असे सूचनाफकल महामार्गावर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. उन्हाळा असल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती वाढली आहे.
जंगलात रानडुक्कर, हरिण, कोल्हे, अस्वल, ससे, रानगायी आदी वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. रस्ता ओलांडताना वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येऊ नये, याकरिता वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्याचे सूचनाफलक वनपरिक्षेत्रात रस्त्याच्या शेजारी लावण्यात आले आहेत. वाहनधारकांना येथे वाहने हळू चालवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, तसेच जंगलातून जाताना हॉर्नचा वापर टाळावा, अशा सूचनाही फलकावर लिहिलेल्या आहेत. याचे नागरिकांनी पालन करण्याची गरज आहे.