आमदार गायकवाड यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून केलेल्या वक्तव्यांवर वारकऱ्यांनी आक्षेप घेतला होता.
संजय गायकवाड यांच्या विधानामुळे सनातन हिंदू धर्मामध्ये उपवास करणारी मंडळी मांसाहाराकडे वळवण्याचा गायकवाडांचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. याप्रकरणी विचारणा करण्यासाठी महाराष्ट्रातून बऱ्याच महाराज मंडळींनी आमदार संजय गायकवाड यांना फोन केला असता त्यांनी उर्मटपणाने बोलत शिवीगाळ करून धमक्या दिल्या आहेत. अशा आशयाची तक्रार अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयात हभप गणेश महाराज शेटे, अरुण महाराज बुरघाटे यांच्या स्वाक्षरीने दाखल करण्यात आली आहे. यावेळी अच्युत महाराज बोराडे, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, प्रकाश महाराज पांडे, सोपान महाराज उकर्डे, श्रीधर महाराज तळोकर, विक्रम महाराज शेटे आदी वारकरी मंडळी उपस्थित होती.