भौतिक सुविधा नसल्यास मान्यता रद्द!
By Admin | Updated: May 24, 2017 01:23 IST2017-05-24T01:23:28+5:302017-05-24T01:23:28+5:30
शैक्षणिक सत्राला सुरुवात होण्यापूर्वी सुविधा उपलब्ध करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

भौतिक सुविधा नसल्यास मान्यता रद्द!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यास, त्या महाविद्यालयांना अकरावी वर्गासाठी प्रवेशित विद्यार्थी देण्यास येणार नाहीत आणि त्यांची मान्यता रद्द असा, इशारा देत शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांना नोटिस बजावल्या आहेत आणि आठ दिवसांमध्ये नोटिसचे उत्तर देण्यास बजावले आहे.
शैक्षणिक वर्ष २0१७ व १८ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी वर्गासाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. महापालिका क्षेत्रातील अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये भौतिक सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे, शुद्ध पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी टेबल, खुर्च्या, ग्रंथालय, पाठ्यपुस्तकांची सुविधा नाही; परंतु सुविधांच्या नावाखाली अपप्रचार करून कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश देतात; परंतु त्यांना भौतिक सुविधा देण्यात येत नाहीत. शिक्षण हक्क कायदा २00९ नुसार विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देणे बंधनकारक आहे; परंतु कनिष्ठ महाविद्यालये त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी दोन महिन्यांच्या सुटीच्या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या येथे भौतिक सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांना नोटिस बजावल्या आहेत.
उपशिक्षणाधिकाऱ्यांची समिती करणार तपासणी
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या की नाहीत. याची तपासणी उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार यांची समिती मे महिन्यात करणार आहे. अकरावी प्रवेश प्रकियेपूर्वी भौतिक सुविधा उपलब्ध न करणाऱ्या महाविद्यालयांना अकरावी वर्गातील प्रवेशासाठी विद्यार्थी देण्याची परवानगी नाकारण्यात येईल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यासंदर्भातसुद्धा शिक्षण संचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असा इशारा सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिला आहे.