अखेर अमन वानखडे यांची मृत्यूशी झुंज संपली!
By Admin | Updated: June 15, 2017 19:54 IST2017-06-15T19:54:54+5:302017-06-15T19:54:54+5:30
उपचारासाठी अन्वी मिर्झापूर वासियांनी गोळा केली होती लोकवर्गणी

अखेर अमन वानखडे यांची मृत्यूशी झुंज संपली!
लोकमत न्यूज नेटवर्क
माझोड : अन्वी मिर्झापूर येथील १७ वर्षीय अमन राजू वानखडे या युवकाचा ५ जून रोजी वाशिंबानजीक अपघात झाला होता. मुलगा सुस्वभावाचा आणि मनमिळाऊ असल्यामुळे आणि घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अन्वी येथील सर्व तरुण मंडळाने आपली शक्ती एकवटून घरोघरी फिरून या युवकाच्या उपचारासाठी लोकवर्गणी गोळा केली आणि त्याला आयकॉन रुग्णालयात दाखल केले. त्याची मृत्यूशी झुंज अखेर १४ जून रोजी संपली.
या अपघातानंतर इतर नागरिक आपल्या मुलासाठी एवढी धडपड करीत आहेत, हे पाहून अमनच्या वडिलांनी त्याची एक एक्कर जमीन विक्रीला काढली आणि उपचार सुरू ठेवला. नऊ दिवसांपर्यंत अमन वानखडे याने मृत्यूशी झुंज दिली. नऊ दिवसांचा कालावधी उलटून गेल्यामुळे आपला मुलगा वाचेल, अशी भोळी आशा आई-वडिलांसमवेत अन्वी ग्रामस्थांना वाटू लाली; परंतु १४ जूनची पहाट उजाळली आणि ‘अमन’ गेल्याची वार्ता गावात धडकली. नातेवाईक, युवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी अमनच्या उपचारासाठी दिलेली मदत व्यर्थ गेली. मनावर दगड ठेवून अमन वानखडेचा मृतदेह अन्वी गावात आणला गेला आणि संध्याकाळी अन्वीच्या स्मशानभूमीत शेकडोंच्या साक्षीने साश्रुनयनांनी त्याला अखेरचा निरोप देण्यात आला.