राजराजेश्वर नगरीत गुंजणार ‘हर्रऽऽ बोला’चा गजर
By Admin | Updated: August 29, 2016 01:36 IST2016-08-29T01:36:33+5:302016-08-29T01:36:33+5:30
अकोलेकरांचा लोकोत्सव आज, जय बाभळेश्वर, डाबकी रोडवासी, हरिहरपेठ, विहिंपची कावड उत्सवाचे आकर्षण.

राजराजेश्वर नगरीत गुंजणार ‘हर्रऽऽ बोला’चा गजर
अकोला, दि. २८: अकोलेकरांचा लोकोत्सव म्हणून नावारूपाला आलेला कावड व पालखी यात्रा उत्सव सोमवारी साजरा होणार आहे. कावडयात्रेला घेऊन शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. पालखी मार्गावर स्वच्छतेसह बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. रविवार सायंकाळी ४ वाजपासूनच शहरातील शिवभक्त मंडळं गांधीग्राम (वाघोली) कडे रवाना झाले. यंदाच्या कावड व पालखी यात्रेत जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळ, डाबकी रोडवासी शिवभक्त मंडळ, हरिहरपेठ शिवभक्त मंडळ आणि विहिंप व बजरंग दल शिवभक्त मंडळाची कावड विशेष आकर्षण राहणार आहे.
अकोलेकरांसाठी सर्वात महत्त्वाचा धार्मिक उत्सव असलेल्या कावड व पालखी उत्सवाची तयारी रविवारी दिवसभर सुरू होती. दरवर्षी श्रावण महिन्यात साजरा होणारा कावड यात्र उत्सवाला आगळीवेगळी परंपरा आहे. पूर्वी श्रावणातील शेवटच्या सोमवारी कावड यात्रा आयोजित करण्यात येत असे. अकोल्यापासून १७ किमी दूर गांधीग्राम येथून पवित्र पूर्णा नदीचे जल आणून राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची परंपरा १९४२-४३ सालापासून अविरत सुरू आहे. पालखी उत्सवाच्या निमित्ताने अकोला ते गांधीग्रामपर्यंतच्या मार्गावर मोक्क्याच्या ठिकाणी पथदिवे लावण्यात आले आहेत. पालखीच्या स्वागतासाठी विविध सामाजिक व धार्मिक संघटना सज्ज झाल्या आहेत. पालखी मार्गावर या संघटना व राजकीय पक्षांनी आपले टेंट आतापासूनच उघडले आहेत. चौका-चौकांमध्ये भाविकांसाठी प्रसाद व फराळासह जलपानाची व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी होर्डिग्ज, बॅनर लावण्यात आले आहेत. स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. पालखी घेऊन जाणार्या मंडळांची रात्री उशिरापर्यंत लगबग सुरू होती. अनेक शिवभक्त मंडळांनी ४५१, २0१, १0१ आणि ५१ भरण्यांच्या कावडी व त्यावर आकर्षक व मनभावक देखावे उभारले आहेत. रात्री उशिरापर्यंत गांधीग्रामला जाणार्यांची चहल-पहल सारखी सुरू होती. एकूणच शहरातील वातावरण शिवमय झाले आहेत.
चार शिवभक्त मंडळांची कावड विशेष आकर्षण
शेवटच्या सोमवारी अनेक कावड मंडळांच्या कावड व त्यांनी साकारलेले देखावे नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय असतो. यंदाच्या कावड यात्रेमध्ये शहरातील डाबकी रोडवरील जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळांची कावड १0१ भरण्यांची आहे. डाबकी रोडवासीयांची कावड ४५१ भरण्यांची राहणार आहे. हरिहरपेठ शिवभक्त मंडळाची कावड ३५१ भरण्यांची आहे, तर सर्वात मोठी कावड ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल शिवभक्त मंडळाची असून, ती ५५१ भरण्याची राहणार आहे.
दूषित पाण्याने जलाभिषेक न करण्याचा निर्णय
पूर्णा नदीतील पाणी हिरवेगार आणि दूषित झाल्यामुळे शहरातील प्रमुख शिवभक्त मंडळांनी या पाण्याने राजराजेश्वराला जलाभिषेक न करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्णेच्या पात्रातील हातपंपाचे पाणी एका भरण्यामध्ये घेऊन त्या पाण्याने राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यात येणार आहे.
१३७ पालख्या सहभागी होणार
महाराष्ट्रात कुठेही साजरा न होणारा पालखी व कावड यात्रा उत्सव केवळ अकोल्यात साजरा होतो. दरवर्षी या उत्सवाला भव्य व व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. यंदाही या यात्रेमध्ये १३७ च्यावर पालखी मंडळे सहभागी होणार आहेत, अशी माहिती राजराजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी दिली.
कावड यात्रेसाठी कडक बंदोबस्त
राजराजेश्वराच्या पालखी कावड यात्रेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्यांसह क्यूआरटी आणि आरसीपी पोलिसांना बंदोबस्तासाठी रविवारी रात्रीपासूनच तैनात करण्यात आले आहे. यामध्ये गांधीग्राम ते अकोलापर्यंत पोलीस बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्या, आरसीपी, क्यूआरटी, जिल्हा पोलीस, आकोट फैल पोलीस तैनात राहणार आहेत. यासोबतच महिला पोलीस, होमगार्ड बंदोबस्तात राहणार असून, राजराजेश्वर मंदिरातही बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फिक्स पॉइंट देण्यात आले असून, दुचाकीवर रात्रभर गस्त सुरू राहणार आहे. नागरिकांनीही सजग राहून कुठे संशयास्पद हालचाली सुरू असल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी केले आहे.