अकोला जिल्ह्याचा निकाल ८४.०२ टक्के!
By Admin | Updated: June 13, 2017 20:07 IST2017-06-13T20:07:04+5:302017-06-13T20:07:04+5:30
जिल्ह्यात पातूर तालुका अव्वल; टक्केवारीत मुलींचीच बाजी!

अकोला जिल्ह्याचा निकाल ८४.०२ टक्के!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मोठ्या प्रतीक्षेनंतर १३ जून रोजी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्याचा निकाल ८४.०२ टक्के लागला आहे. टक्केवारीत यावर्षीही मुलींनीच आघाडी घेतली आहे. ८६.५ टक्के प्राप्त करू न पातूर तालुका निकालात जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
जिल्ह्यातील ४४१ शाळांमधून २८,४१३ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. यातील २३,८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी ८४.०२ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात २८,४९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये १५,०३३ मुले तर १३,४६२ मुली होत्या. प्रत्यक्षात २८,४१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात १४,९७५ मुले तर १३,४३८ मुलींचा समावेश होता. यातील ११,९९६ मुले उत्तीर्ण झाले असून, ११,८७८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उतीर्ण होण्यामध्ये मुलींची टक्केवारी ८८.३९ तर मुलांची टक्केवारी ८०.११ एवढी आहे.
जिल्ह्यात यावर्षी पातूर तालुक्याने बाजी मारली असून, या तालुक्यात ४१ शाळांमध्ये २१८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात २,१७९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १,०१८ मुले उत्तीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी ८२.८३ आहे, तर ८५७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याची टक्केवारी ९०.२१ एवढी आहे.
दरम्यान, अकोला तालुका निकालात दुसऱ्या क्रमांकावर असून, या तालुक्याचा निकाल हा ८५.०७ टक्के एवढा आहे. बाळापूर तालुक्याचा निकाल ८४.९९ टक्के, बार्शीटाकळी तालुका ८४.९३ टक्के, अकोट तालुका ८१.३५ तर तेल्हारा तालुक्याचा निकाल ८०.५१ टक्के एवढा लागला आहे.
४,५३९ विद्यार्थी अनुत्तीर्ण
जिल्ह्यात एकूण नोंदणीपैकी प्रत्यक्षात २८,४१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २३,८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच ४,५३९ विद्यार्थी यावर्षी अनुतीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी १५.९८ एवढी आहे.