५४६ ग्रामपंचायतींमध्ये तयार होणार विकास आराखडा!
By Admin | Updated: June 9, 2016 02:08 IST2016-06-09T02:08:35+5:302016-06-09T02:08:35+5:30
‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेने नेमले प्रभारी अधिकारी.

५४६ ग्रामपंचायतींमध्ये तयार होणार विकास आराखडा!
संतोष येलकर /अकोला
ग्रामपंचायतींचे स्वउत्पन्न, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि चौदाव्या वित्त आयोगाद्वारे प्राप्त होणार्या निधीतून 'आमचं गाव, आमचा विकास' या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींमध्ये विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत गत मे अखेरपर्यंत जिल्ह्यातील पंचायत समिती गण स्तरावर प्रभारी अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
चौदाव्या वित्त आयोगाचा निधी मिळविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय गत ४ नोव्हेंबर २0१५ रोजी शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार सन २0१५-१६ ते २0१९-२0 या कालावधीसाठी जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींच्या स्तरावर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना विविध करांच्या माध्यमातून प्राप्त होणारा निधी, शासनाकडून प्राप्त होणारा जमीन महसूल उपकर, मुद्रांक शुल्क अनुदान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मिळणारा निधी, चौदाव्या वित्त आयोगाचा निधी, स्वच्छ भारत अभियान, लोकसहभाग आणि जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध होणार्या निधीचा विचार करून ग्रामपंचायत स्तरावर पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. आराखडा तयार करताना ग्रामपंचायतींना अपेक्षित स्वनिधीच्या दुप्पट कामे पुढील पाच वर्षांसाठी प्रस्तावित करावी लागणार आहेत. अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विकास आराखडा तयार करण्याचे नियोजन जिल्हा परिषदमार्फत करण्यात आले आहे. लोकसहभागातून विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती गण स्तरावर प्रभारी अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये विस्तार अधिकारी संवर्गातील अधिकार्यांचा समावेश आहे.
या ग्रामपंचायती तयार करणार विकास आराखडा!
तालुका ग्रामपंचायती
अकोला ११0
आकोट ८३
बाश्रीटाकळी ८२
बाळापूर ६६
तेल्हारा ६२
पातूर ५७
मूर्तिजापूर ८६
एकूण ५४६