अकोला जिल्ह्यात ५४६ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप
By Admin | Updated: August 17, 2014 01:50 IST2014-08-17T01:48:02+5:302014-08-17T01:50:26+5:30
स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात जिल्हाधिकार्यांचे प्रतिपादन

अकोला जिल्ह्यात ५४६ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप
अकोला : राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६ हजारांपेक्षा जास्त शेतकर्यांच्या पिकांचा ५३ कोटी १३ लाख रुपयांचा विमा संरक्षित करण्यात आला आहे.तसेच जिल्ह्यात ५४६ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप शेतकर्यांना करण्यात आले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शुक्रवारी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित शासकीय मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात जिल्हाधिकारी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.एस.एस. वानखेडे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, मनपा आयुक्त महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी शिवाजीराव दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे,होमगार्डचे जिल्हा समादेशक विजय उजवणे,जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते.
पुढे जिल्हाधिकारी म्हणाले की, यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हय़ातील शेतकर्यांना ७१९ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी आतापर्यंंत ५४६ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत महसूल विभागामार्फत विविध शासकीय योजना जनतेपर्यंंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्हय़ात ५0 हजारांपेक्षा जास्त लाभार्थींंना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले असून, ई-फेरफार प्रणालीचा प्रारंभ महाराष्ट्रात सर्वप्रथम अकोल्यात करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय योजनेतून जिल्ह्यात १३0 कोटींची विकासकामे मंजूर करण्यात आली असून, त्यामध्ये ७0 कोटींच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वसतिगृह व अतिदक्षता विभागाचे बांधकाम, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत,जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत,अकोला उपविभागीय व तहसील कार्यालय इमारत, तेल्हारा तहसील कार्यालय इमारत बांधकामाचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी शिंदे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अंधारे यांनी केले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.