अकोले : युती सरकारच्या काळात कालव्यांसह निळवंडे धरण प्रकल्प पूर्ण होणे हे शक्य वाटत नाही. अकोले तालुक्यासाठी किमान उंचावरील कालवे पूर्ण होण्यासाठी निधी मिळावा म्हणून रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडावे लागेल असे स्पष्ट करत तालुक्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे ऊसाच्या बाबतीत अगस्ती लवकरच स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केला. अगस्ती सहकारी साखर कारखानच्या गळीत हंगामाची सांगता बुधवारी सायंकाळी झाली. त्या प्रसंगी ते बोलत होते. या गळीत हंगामात ४ लाख ५१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून सरासरी ११.३० टक्केच्या साखर उताऱ्यातून ५ लाख १० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याकडे कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना आतापर्यंत एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांना पेमेंट केले असून यंदा १ हजार ७०० रुपये पहिले पेमेंट अदा केले आहे. लवकरच एफआरपीप्रमाणे यंदाचे पैसे अदा केले जातील, असे पिचड म्हणाले. आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांची मनोगते झाली. जे. डी. आंबरे, यशवंत आभाळे, नगराध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, संचालक कचरु पाटील शेटे, अशोक देशमुख, गुलाब शेवाळे, कार्यकारी संचालक वसंत बाविस्कर, लेखापाल एकनाथ शेळके आदी उपस्थित होते.
निळवंडेसाठी रस्त्यावर उतरावे लागेल
By admin | Published: April 15, 2016 12:02 AM