व्हीलचेअरवर बसून गौतमने फिरविले प्रगतीचे चक्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:20 AM2021-03-22T04:20:35+5:302021-03-22T04:20:35+5:30
श्रीगोंदा : २०१४ला घराच्या छतावरून पडल्याने मज्जातंतू तुटले. दोन्ही पाय निकामे झाले. अशा परिस्थितीत सारोळा सोमवंशी (ता.श्रीगोंदा) येथील गौतम ...
श्रीगोंदा : २०१४ला घराच्या छतावरून पडल्याने मज्जातंतू तुटले. दोन्ही पाय निकामे झाले. अशा परिस्थितीत सारोळा सोमवंशी (ता.श्रीगोंदा) येथील गौतम दत्तात्रय आढाव या युवकाने हार न मानता व्हीलचेअरवर असतानाही डाळ मिल, बंद पडलेले वर्कशॉप आणि पिठाची गिरणी पुन्हा सुरू केली. संघर्षाच्या मैदानात उतरला आणि उद्योगविश्व निर्माण केले.
गौतम आढाव या दहावी पास युवकाचा २००९ मध्ये अकोळनेर येथील संभाजी ठुबे यांची कन्या सुवर्णा हिच्याशी विवाह झाला. वर्कशॉप व पिठाच्या गिरणीतून उदरनिर्वाह सुरू केला. सुखी संसारात अंजली, अनुष्का ही पुष्प उमलली. मात्र, २०१४ मध्ये गौतम हा घराच्या छतावर चढला होता. तोल गेला आणि जमिनीवर कोसळला. पाठीच्या मणक्यातील मज्जातंतू तुटले. दोन्ही पाय निकामे झाले. गौतमच्या जीवनात अंधार निर्माण झाला. मोडलेला संसार पुन्हा कसा उभा करावा आणि चालवावा, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला.
अशा परिस्थितीत गौतमने व्हीलचेअरच्या साहाय्याने प्रगतीचे चक्र फिरविण्याचा संकल्प केला.
दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावात डाळ मिल सुरू केली.
त्यानंतर, पिठाची गिरणी, वर्कशॉप सुरू केले. नातेवाइकांनी मदतीचा हात दिला. पत्नी सुवर्णा यांनी पतीच्या संघर्षात उभी राहिली आणि संसार पुन्हा उभा राहू लागला. सात वर्षांत जिद्द, कठोर परिश्रम आणि इच्छाशक्तीच्या बळावर गौतमने स्वत:चे उद्योग विश्व निर्माण केले. तो बेरोजगार युवापिढीसाठी आदर्श ठरला आहे.
--
दोन्ही पाय निकामी झाल्याने जीवनात अंधारमय परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत पाय नसले, म्हणून काय फरक पडतो, हात आहेत ना, असे म्हणत याच हाताचा वापर करून उभा राहिलो. मित्र, नातेवाइकांनी मदत केली. पत्नी सुवर्णा हिने माझी जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली.
-गौतम आढाव,
सारोळा सोमवंशी
--
२१ गौतम
सारोळा सोमवंशी येथील गौतम आढाव हा युवक.